समतेची शरण चळवळ आणि ‘महात्मा बसवेश्वर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून ९०० वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते. शेटजी-भटजी, ब्राह्मण या फुकटचे खाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असली तरी बहुसंख्य बहुजनांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात होते. धर्माच्या नावाखाली अधर्माचे स्तोम माजले होते. शूद्रांचा स्पर्श बाट समजला जात होता. समाज अंधश्रद्धेत जखडला गेला होता. दगड धोंड्याला देव मानून पूजा करणाऱ्या लोकांचा वर्ग मोठा होता. राजे-महाराजे लढाया करण्यामध्ये व्यस्त होते. बहुदेव उपासना वाढली होती. निती- नैतिकतेपेक्षा भोळा भक्तीभाव वाढला होता. दंभ-दांभिकता वाढली होती. यज्ञ, होम-हवन, पशुहत्या, सोवळे-ओवळे, व्रतवैकल्य, अवडंबर आणि बुवाबाजी वाढली होती. कल्पोकल्पित ग्रंथांना प्रमाण मानून समाज नागवला जात होता. याच शतकांमध्ये प्रस्थापित समाजव्यवस्था बदलण्याचे आणि समग्र समाजक्रांती घडविण्याचे काम महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकामध्ये केले.

तत्कालीन मंगळवेढा राज्यावर कलचुर्य राजा बिज्जल राज्य करीत होता. त्याच्या मंगळवेढा राज्यातील बागेवाडी या छोट्या गावात मंडगी मादिराज आणि मादलांबिका या पाशुपत शैव कम्मे कुळातील दांपत्याच्या पोटी २५ एप्रिल ११०५, वैशाख शुद्ध तृतीया, अक्षय्य तृतीया दिवशी महात्मा बसवण्णांचा जन्म झाला. बसवण्णा हे मादिराज आणि मादलंबिका यांचे तिसरे संतान होते. त्यांच्यापूर्वी देवराज आणि अक्कनागाई ही दोन रत्ने त्यांना प्राप्त झाली होती. बसवण्णा बालवयापासूनच चाणाक्ष बुद्धीचे होते. समाजातील सर्व घटनांचेे बसवण्णा निरीक्षण करत. आई-वडिलांना प्रश्न विचारत यज्ञात पशु प्राण्यांचा व बोकडाचा बळी का देतात ? देव प्राण्याचा बळी मागतो का ? मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश का नाही ? अस्पृशांना ओंजळीतून पाणी का वाढतात? माणसे माणसाशी माणसाप्रमाणे का वागत नाहीत ? असे प्रश्न बसव उपस्थित करू लागले. आजचा दिवस शुभ आहे, अमुक तिथी अशुभ आहे. अमुक दिवस शुभ आहे, असे म्हणणाऱ्या लोकांना बसवण्णा म्हणतात, आज-उद्या नका म्हणू, आजचा दिवस शुभ शरण म्हणणाऱ्यास, आजचा दिवसच शुभ हर शरण म्हणणाऱ्यास, आजचा दिवस शुभ कुडलसंगम देवास न चुकता स्मरणाऱ्यास.

म्हणजेच बाराव्या शतकातील शरणांचे तत्त्वज्ञान हे मानव केंद्री होते, ते समाजकेंद्री होते. ज्योतिष, पंचांग, भविष्य, वास्तुशास्त्र, कर्मकांड, अवडंबर, जातिवाद, स्पृश्य-अस्पृश्य भेद, लिंगभेद, ऐतखाऊवृत्ती, दंभ-दांभिकता, संन्यासवाद, यज्ञयाग, होम-हवन, अनाचार यावर बसवण्णांनी कडाडून प्रहार केला. शरणांनी या सर्वाला विरोध केला.

बालपणीच्या काही प्रसंगातून बसवण्णांचे वेगळेपण समजून येते. बसवण्णांचा केत नावाचा चांभाराचा मित्र बसवण्णांसाठी जोडे घेऊन येतो. तेव्हा त्या केत नावाच्या चांभाराच्या मित्राला स्पर्श करू नको, असे बसवाची आई बसवाला सांगते. बसवण्णांना प्रश्न पडतो, त्याने बनवलेले जोडे आपल्याला चालतात तर त्याचा स्पर्श का चालत नाही?

बहुदेव उपासना करणाऱ्या आपल्या वडिलांना बसवण्णा अंगणात खड्डे खोदून एकदेव उपासनेचे महत्व पटवून देतात.
यज्ञ-हवन करणाऱ्या दांभिक भटजी अग्नीला देव मानतात. अग्निमध्ये खाण्यायोग्य दूध, तूप, तीळ, तांदूळ, महागडे जिन्नस टाकून त्याची नासाडी करतात. पण तो अग्नी जेव्हा त्यांचे घराला भस्मसात करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो अग्नी देव राहत नाही. प्रसंगी ज्या अग्नीत भटजी तूप टाकतात त्याच अग्नीवर ते गटारीचे पाणी, माती टाकतात. हाच दांभिकपणा बसवण्णा वचनात सांगतात.
अग्नीला देव मानून त्यामध्ये आहुती देणाऱ्या ब्राम्हणाच्या घराला आग लागली असता, मोरीचे पाणी टाकतात, रस्तावरची धूळ टाकतात, आरडाओरडा करतात , अग्नीची स्तुती करायची सोडून निंदा करतात, कुडलसंगमदेवा.

भावार्थ: कर्मकांड करणाऱ्या , होम-हवन करणाऱ्या ब्राम्हणांचा ढोंगीपणा उघड करताना बसवण्णा म्हणतात, हे ब्राम्हण पुरोहित यजमानांच्या घरी जाऊन होम हवन करतात, अग्नी देव आहे म्हणून सांगतात. त्या अग्नीला तृप्त करण्यासाठी अग्नीत तूप, तांदूळ,तीळ इ. धान्य होमात यज्ञात टाकून जाळून वाया घालवतात. त्या अग्नीची तोंड भरून स्तुती करतात मात्र तोच अग्नी त्यांच्या घराला लागला की मात्र मोरीचे , गटारीचे पाणी आणि रस्त्यावरची धूळ माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करतात.आरडाओरड करून मदतीसाठी लोकांना गोळा करतात. अग्नीची स्तुती करायची सोडून निंदानालस्ती करतात. अग्नीला शिव्या देतात, नावे ठेवतात.

पुढे बसवण्णा प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षण घेण्यासाठी कुडलसंगमला गेले. त्याकाळी कुडलसंगम पाशुपत शैवांचे ज्ञान केंद्र होते. कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नद्यांच्या संगमावर असणाऱ्या कुडलसंगम क्षेत्रांमध्ये बसवांनी वीस वर्ष शिक्षण घेतले. अध्ययन केले. प्राच्यविद्या, प्राच्यभाषा, धर्मग्रंथ, धर्मशास्त्र, पुराणे, वेद, आगम-निगम स्मृतिग्रंथ षडदर्शने उपनिषिदे शैव पंथ गणित सामुद्रिक शास्त्र, शैवपंथ, जैन, बौद्ध धर्माचा अभ्यास केला. हे वीस वर्ष बसवाची बहिण नागाई त्यांच्यासोबत होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर बसवण्णांची आणि मामा बलदेवाची भेट झाली. मामाच्या सांगण्याला मान देऊन बसवण्णा कुडलसंगम सोडून मंगळवेढ्याला आले. बिज्जल राजाच्या दरबारात कारणिक म्हणून नोकरी मिळवली. ऐन तारुण्यात आलेले बसवण्णा सूंदर रूपवान ज्ञानाने प्रगल्भ विचारांची विशिष्ट उंची लाभलेले युवक बनले. बसवण्णा समाजप्रिय व्यक्तिमत्व बनले. सर्वगुणसंपन्न बसवण्णा आपले जावई व्हावे, अशी आशा मनात धरून मामा बलदेव यांनी आपली मुलगी गंगाबिकाशी विवाह करावा, असा आग्रह केला. मामाच्या आग्रहाला मान देऊन बसवण्णा गंगाबिकेशी विवाहबद्ध झाले.

मंगळवेढ्यात असताना बसवण्णांनी समाजजीवनाचे बारकाईने निरीक्षण केले. समाजातील जातिभेद, लिंगभेद, उच्चनीचभेद या सर्वांतून समाजाला मुक्त करण्यासाठी बसवण्णा चिंतन करू लागले. पुढे बिज्जल राजा चक्रवर्ती झाला. कल्याण चालुक्य राजाच्या मांडलिक असणारा बिज्जल कल्याण राज्याचा राजा झाला. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या जोरावर बसवण्णा कल्याण राज्याचे प्रधानमंत्री झाले. कल्याणमध्ये बसवण्णांच्या कार्याला गती मिळाली.बसवण्णांना त्यांच्या कुटुंबाची साथ मिळाली. अग्रजापासून अंत्यजापर्यंत सर्वजण बसवण्णांच्या शरण चळवळीत सामील झाले. त्या चळवळीत झालेल्या सहभागी पुरुषांना आणि स्त्रियांना अनुक्रमे शरण-शरणी अशी नावे मिळाली. शरण चळवळीचे रूपांतर पुढे स्वतंत्र लिंगायत धर्मामध्ये झाले. लिंगायत धर्माची धर्मांतही झालेल्या शरणांची पूर्वाश्रमीची जात नष्ट झाली. अग्रज-अंत्यज यांच्यात रोजी बेटी व्यवहार सुरू झाले जातीच्या भिंती तुटून पडल्या बसवाच्या शरणचळवळरुपी झाडाला समता, समानता, बंधुता, विवेक, कायक, दासोह याची फळे आली. समाजाच्या प्रत्येक थरातून स्त्री-पुरुष बसवण्णांच्या लिंगायत चळवळीत सामील झाले, ते शरण झाले.

शरण म्हणजे शरण परिवारात राहणारा, वचनांवर विश्वास ठेवणारा, नित्य,सत्य-शुद्घ दासोह करणारा ,चर्चा-अनुभाव-अनुभव करणारा, लिंग-जाती इ. भेद न मानणारा, मुक्त व्यक्ती म्हणजे शरणी-शरण पण हीच व्याख्या २१ व्या शतकाला अनुसरुन करावी लागेल, ती अशी होईल- निजमुक्त, निर्मोही, जाती-लिंग-वर्ण-वर्ग इ. भेद विरहित, कायकनिरत, दासोही, अनुभवी म्हणजेच शरण
मातंग चेन्नय्या, डोहर कक्कय्या, हडपद अप्पाण्णा, नुलीय चंदय्या, कुंभार गुंडय्या, चांभार हरळय्या, अंबिगर चौडय्या, मेदार बुरुड केतय्या, तुरुंगाहि रामण्णा, मादार धूळय्या, वैद्य संगण्णा, कन्नप्पा तेली, किन्नरी बोमय्या, अल्लमप्रभु, बहुरुपी चौडय्या, शरण सुरय्या, शरण उरलिंगदेव हे शरण शुद्रतिशूद्र समजल्या जाणाऱ्या जातीतून बसवांच्या चळवळीत सहभागी झाले. सुळे सक्कव्वे, सुळे पद्मलदेवी, सुळे चामलदेवी यांसारख्या वेश्या बसवाच्या विचाराला प्रभावित होऊन शरणी झाल्या. वेश्या आपला पूर्वाश्रमीचा व्यवसाय आणि पूर्वाश्रम सोडून पुण्यंगना झाल्या. चोर, लुटारु, दरोडेखोर यांनी आपले दुष्कृत्य सोडून दिले. ते शरण बनले. दारू विकणारा हेडद मारय्या वाटसरुंच्या सेवेसाठी पाणी, दूध आणि ताक विकायला लागला.

सर्वजण दुष्कर्मे सोडून सदाचारी बनले,शरण बनले. बसवण्णांनी ऐतखाऊ लोकांचे मनपरिवर्तन केले. त्यांना कष्टाचे महत्त्व समजावून सांगितले. कायकाकवे कैलास, श्रम हाच ईश्वर हा मूलमंत्र बसवण्णांनी भारतीय अर्थव्यवस्थेला दिला. श्रमाला व्यवसायाला कायकाला मानाचे, सन्मानाचे स्थान प्राप्त करून दिले. दिवसभर कष्ट करून शरण संध्याकाळी अनुभवमंटपात एकत्र येत. विचारविनिमय, चर्चा करत. शरणांच्या स्वानुभवातून वचने जन्माला आली. तीच वचने म्हणजेच भारतीय संविधानाचा गाभा आहे. संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, स्त्री-पुरुष समानता ही मूल्ये शरणांच्या समताधिष्ठित वचनात दडली आहेत.

समाजातील प्रत्येक घटकाने सदाचाराने आचरण करावे. नितिनियमांचे पालन करावे. अनाचार करू नये. चोरी, क्रोध, राग, स्तुती, मत्सर, आत्मस्तुती करू नये असे बसवण्णा एका वचनात सांगतात. बसवण्णा म्हणतात, चोरी करू नको, हत्या करू नको, खोटे बोलू नको, रागावू नको, इतरांचा तिरस्कार करू नको, दुसऱ्याची निंदा करू नको, हीच अंतरंगशुद्धी, हीच बहिरंगशुद्धी, हेच कुडलसंगमदेवाला प्रसन्न करण्याची रीत आहे.

आयुष्यभर मला शरणांची सेवा करण्याची संधी मिळावी, असे बसवण्णा वचनात सांगतात, मंदिराचा कळस बनून कावळ्याच्या विष्टेने अपवित्र होण्यापेक्षा शरणांच्या पायातील पादुका करा, मज कूडलसंगमदेवा.

सदाचारी कायकनिष्ठ शरणांची तुकडी बसवण्णांनी उभी केली. कष्टानेच शिवाची पुजा केली. कल्याणच नव्हे तर कल्याणच्या आसपास, संपूर्ण दक्षिण भारतात, संपूर्ण उत्तर भारतात, इराक-इराण अफगाणिस्तानपर्यंत बसवण्णांचा विचार जाऊन पोहोचला. त्या विचाराने प्रभावित होऊन शरण कल्याणच्या अनुभवमंटपाकडे येऊ लागले. कल्याण म्हणजे सध्याचे बसवकल्याण. हे क्रांतीचे केंद्र बनले. अफगाणिस्तानपर्यत बसवण्णांचा विचार जाऊन पोहचला. मरूळशंकरदेव नावाचे शरण कल्याणला आले. पूर्वाश्रमी मुसलमान असणारे मरूळशंकरदेव कल्याणमध्ये येवून लिंगधारी झाले, लिंगायत झाले. त्यांना शरणांनी ” मरूळशंकरदेव ” असे नाव दिले. राजदरबारात भांडी धुण्याचा कायक करून ते आपली उपजीविका करू लागले.

काश्मीर होऊन राजा भूपाल महादेव आपल्या पत्नीसह कल्याणला आला. त्याने काश्मिरचे राज्य आपल्या मुलाला देऊन तो शरण झाला, लिंगधारी झाला. मोळीगे मारय्या आणि महादेवी ही नावे धारण करून काश्मीरचे राजा राणी कल्याणमध्ये मोळी विकण्याचा कायक करू लागले. कष्ट करून जगू लागले. मोळीगे मारय्यांविषयी बसवण्णा एका वचनात म्हणतात, भक्तासाठी दहा बोटाची मेहनत, गणना महाभक्त होण्यासाठी, परी तुझे पोट भरणार नाही, भार होणार तू भूमंडळी, त्यात दोन्ही हाताने परिश्रम तू करी, मिळेल भाकरी सर्वालागी, मोळीगे मारय्या असुनी राजा थोर, श्रम भरपूर केले त्याने, कूडलसंगमदेवा कायक जो करील, त्याला तारील देव माझा.

काश्मिरहून चिक्कय्या नावाचा हत्यारी कल्याणला बसवाला मारण्यासाठी आला. शरणांचा सदाचार कायकनिष्ठा वर्तन पाहून हत्यारी चिक्कय्याने आपला हत्या करण्याचा व्यवसाय सोडून दिला. त्यांनी बसवांनी घालून दिलेल्या लिंगायत धर्माचा स्वीकार केला. तो शरण झाला. जंगलातून आणलेली ताडपत्रे शरणांना विकून त्यावर तो उदरनिर्वाह करू लागला. चिक्कय्या शरणांमध्ये कायकनिष्ठ, सदाचारी शरण म्हणून मान्यता पावले.

काश्मिरची राजकन्या बोंतादेवी कल्याणमध्ये येऊन शरणी झाली. राजवैभवात वाढलेली बोंतादेवी कल्याणमध्ये गुहेत राहू लागली. वैद्यकीय शास्त्राचे उत्तम ज्ञान असणारी बोंतादेवी रोग्यांची सेवा करू लागली. त्याचबरोबर गोधडी शिवून विक्री करू लागली. त्यावरून तिला बोंतादेवी असे नाव पडले.

महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकात श्रमजीवी समाजाची निर्मिती केली. कल्याणच्या अनुभवमंटपात निर्माण झालेल्या वचन साहित्याने कन्नड भाषेला समृद्ध केले. माणसाची जीवन जगण्याची शैली बदलून टाकली.

एके दिवशी बसवण्णा कल्याण नगराचा हालहवाल पाहण्यासाठी फेरफटका मारत असताना हरळय्या नावाच्या चांभाराच्या शरणांच्या आग्रहाला मान देऊन त्याच्या घरी जाऊन दासोह करतात. जेवण करून निघताना बसवण्णा हरळय्यांना विनयपूर्वक हात जोडून ” शरणूशरणार्थी शरण हरळय्या ” म्हणून नमस्कार करतात. हरळय्याही विनयपूर्वक हात जोडून नमस्कार करतात. बसवण्णा घरातून बाहेर गेल्यावर हरळय्यांच्या लक्षात येते की बसवण्णांनी आपल्याला हात जोडून नमस्कार केला. त्याचे ओझे आपल्यावर झाले. ते कमी करण्यासाठी ते आपल्या पत्नीशी चर्चा करतात. ते दोघेही निर्णय घेतात. आपण बसवेश्वरांना आपल्या कातडीचे जोडे भेट द्यायचे. हरळय्या डाव्या मांडीचे, कल्याणीम्मा उजव्या मांडीचे कातडे काढून बसवासाठी सुंदर जोडे बनवतात. ते जोडे बसवांना भेट देतात. बसवण्णा जोडी पाहून म्हणतात, अरेरे हरळय्या ! , हे जोडे खुप सुंदर आहेत. पण हे जोडे कोणत्याही प्राण्याच्या कातडीचे नाहीत तर माझ्या शरणांच्या कातड्याचे आहेत. त्याक्षणी हरळय्या बसवण्णांचे चरणस्पर्श करतात. चरणस्पर्श करणाऱ्या हरळय्याला बसवण्णा आपल्या ह्रदयाशी लावतात आणि म्हणतात ,माझ्यापेक्षा लहान कोणी नाही, शिवभक्ता पेक्षा महान कोणी नाही,याला माझे मन साक्षी, तुमचे चरण साक्षी कूडलसंगमदेवा.

हरळय्यांनी बनवलेले जोडे त्यांना परत करतात. त्या जोड्याची मधुवरस नावाचा ब्राह्मण मंत्री विटंबना करतो. कालांतराने तो मधुवरस बसवण्णा यांच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित होतो आणि शरण बनतो.

एके दिवशी सायंकाळी भरलेल्या अनुभव मंटपात ब्राम्हण मधुवरसाची कन्या कलावती आणि चांभार हरळय्याचा मुलगा शीलवंत यांच्या विवाहाचा निर्णय शरण एकमुखाने घेतात. मधुवरस आणि हरळय्या दोघेही लिंगधारी असल्याने त्यांच्यात रोजी-बेटी व्यवहार होत होता. शरण कलावती आणि शीलवंतचा विवाह करून देतात. हा विवाह कोणताही धर्म बुडवणारा नव्हता कारण दोघेही लिंगधारी शरण होते पण प्रस्थापित वैदिक व्यवस्थेने हा विवाह अमान्य केला.

बिज्जल राजाचे कान भरले. बिज्जल राजाने बसवण्णांना हद्दपार केले. वचनसाहित्य जाळले. शीलवंत हरळय्या आणि मधुवरस यांना हत्तीच्या पायाला बांधून देहदंडाची शिक्षा दिली. शिल्लक राहिलेले वचन साहित्य घेऊन शरण बैलहोंगलमार्गे उळवीला गेले. या प्रवासात शरण दोन ठिकाणी मारले गेले. बिज्जलाचे सैन्य आणि शरण यांच्यात युद्ध झाले. हरळय्याची पत्नी कल्याणीम्मा, मडिवाळ माचीदेव, किन्नरी ब्रम्हय्या आणि शरण या उळवीच्या प्रवासात गतप्राण झाले. माता नागाई, चेन्नबसवण्णा, मडिवाळ माचीदेव, डोहर कक्कय्या या गणाचारी शरणांच्या नेतृत्वाखाली वचन सुरक्षित उलवीला पोहचले. उळवीच्या महामनेत, आकाळगवीत, विभूतीकनज, रुद्राक्षमंटप या गुहेत वचन सुरक्षित लपवून ठेवले.

जंगलात काही काळ गुहेत, पावसाळ्यात झाडाला झोके बांधुन शरण उळवीत राहिले. गोव्याच्या कदंब राजाने शरणांना आश्रय दिला. ही सर्व क्रांतिकारी घटना कल्याण क्रांती म्हणून नावारूपाला आली शरण संस्कृतीचा इतिहास समृद्ध करणारी ही घटना आजही अंगावर शहारे उत्पन्न केल्याशिवाय राहत नाही कल्याण सोडून बसवन्ना कुडल संगम ला गेले तेथेच ते लिंगाशी एकरूप झालेलिंगैक्य पावले. त्याच्याबरोबर त्याचे सहकारी हडपद अप्पण्णा आणि बसवपत्नी निलंबिका मृत्यू पावले. कल्याणक्रांतीत सहभागी मडिवाळ माचीदेव वृद्धवस्था आणि युद्धातील जखमांमुळे मुरगोडला मरण पावले. वयाने जेष्ठ असणारे कक्कय्या युद्धात निष्णात होते. वचनसाहित्य रक्षणासाठी गेलेले कक्कय्या बिज्जलाच्या सैन्यांशी झालेल्या युद्धात कक्केरीला मृत्यू पावले. उळवीला चेन्नबसवण्णांनी, उळवीच्या महामनेजवळ किन्नरी बोमय्यांनी, तडीकेरेला गेलेल्या, वृद्धवस्थामुळे थकलेल्या माता नागाईनी तेथेच आपला देह ठेवला. शरण शून्यात विलीन झाले. ह्या घटनेचे दुःख सोलापूरच्या सिद्धरामेश्वरांना झाले ते एका वचनात म्हणतात,बसवा बसवा हे शब्द लोपले, सर्वांचा आधार बसवरूपी खांब मोडला, बसवायच्या कार्याची हानी झाली कपिलसिद्ध मल्लिकार्जुना.
( व. क्र. ५९७.)

महात्मा बसवण्णानी व्यवस्था परिवर्तन केले व्यवस्थेत बदल केला. एकांताकडून- लोकांताकडे, अज्ञानाकडून- ज्ञानाकडे दानधर्माकडून- दासोहाकडे, मंदिराकडून- अनुभवमंटपाकडे, वैराग्याकडून- गृहस्थीजीवनाकडे, कठोरतेकडून- सहजतेकडे, शिष्यत्वाकडून- शरणजीवनाकडे, बहुदेवतावादाकडून-एकेश्वरवादाकडे, संस्कृतकडून- लोकभाषा कन्नडकडे, अंधश्रद्धेकडून विवेकवादाकडे ऐतखाऊवृत्तीकडून कायकवादाकडे, विषमतेकडून- – समानतेकडे, शिवलिंगाकडून- इष्टलिंगाकडे, देवालयाकडून-देहालयाकडे, शैवपंथाकडुन- स्वतंत्र लिंगायत धर्माकडे, कल्पोकल्पित ग्रंथाकडून- अनुभवी वचनसाहित्याकडे, देहदंडणाकडून- देहधर्माकडे, ग्रंथप्रमाण्यवादाकडून-बुद्धिप्रामाण्यवादाकडे घेऊन जाणारी नवी व्यवस्था निर्माण करणारे बसवण्णा सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होती. नवा पथ मार्ग शोधणारे ते एक पथदर्शी होते.

महात्मा बसवण्णांनी जनसामान्यांना सहज साधी शिकवण दिली. त्यांची शिकवण सामान्य माणसासाठी आहे. ती सहज साधी आणि सोपी आहे. संसारी माणसाच्या जगण्याचे जीवन तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. ते घरोघरी जात. शरणूशरणार्थी करत. शरण कक्कय्या, हरळय्या, चेन्नय्या, नुलीय चंदय्या, मडिवाळ माचीदेव, व घटीवाळय्या या कष्टकरी, दीनदलित, आदिवासी, अठरा आलुतेदार, बारा बलुतेदार, यांना बसवण्णा एकत्र करू लागले. त्यांना सहज साधे जीवन तत्त्वज्ञान सांगू लागली एकाच देवाची इष्टलिंगाची साधना करा. देहच देवालय आहे. एकत्र या चर्चा करा. सुसंवाद करा. स्त्रियांना समान अधिकार द्या. पंचसूतके पाहू नका. दलितांना समान संधी द्या. जातीभेद, वर्णभेद, लिंगभेद करू नका. कोंबडे-बकरे कापू नका. स्वकष्टावर जगा. भिक्षा मागून खाऊ नका. काम कष्ट करा. कायकात कैलास आहे. दासोह समाजसेवा आहे. पर्यावरण रक्षण करा. दगडधोंडे पुजू नका.

पुरोहिताच्याहस्ते देवपूजा करू नका. ज्योतिष, भविष्य, वास्तुशास्त्र, पंचांग पाहू नका. यज्ञ, होम-हवन करु नका. अनुभव मंटपात बसा. प्रश्न उत्तर करा, चर्चा करा. वचन साहित्य द्या. शुभाशुभ पाहू नका. नदी-स्नान करू नका. एकमेकांच्या पाया पडू नका. शरणूशरणार्थी म्हणा. संन्यासवादाचे उदात्तीकरण करू नका. संसारिक जीवन जगा. अस्पृश्यता पाळू नका. माणसाला माणसाप्रमाणे वागवा. पशुहत्या करू नका. मांसाहार करू नका व्यसनाधीन बनू नका. चोरी करु नका. हत्या करु नका. रागावू नका. खोटे बोलू नका. कोणाची घृणा करु नका. दया हाच धर्म आहे. सदाचाराने वागा. निती-नैतिकता आणि विवेकाने वागा. दयाच धर्माचा मूलमंत्र आहे. शरणांची थट्टा मस्करी करू नका. नवस-सायास करू नका. अंधश्रद्धा सोडून द्या. प्राणीमात्रावर दया करा. भुकेलेल्याला अन्न द्या. घोर जपतप करू नका. झोपच जप आहे. कठोर देहदंडण, इंद्रियदमन करू नका. देहाला कष्ट देऊ नका. देह कायकासाठी कष्टवा. उपवास-तापास, व्रतवैकल्ये करू नका. वेळेवर दिवस वर्ष यात भेद करू नका. प्रत्येक दिवस, वार शुभच आहे. मरण महानवमी आहे, त्याचे स्वागत करा. सुखी संसार करा, संसार सोडून हिमालयात जाऊ नका. संन्यास धारण करण्याची गरज नाही. मूर्तिपूजा सोडून द्या. अनावश्यक खर्च करू नका. काल्पनिक स्वर्ग-नरक यावर विश्वास ठेवू नका. सदाचार स्वर्ग आहे. अनाचार नरक आहे. देवघर गाव सोडून अन्यत्र भटकू नका.

शेत पावनभूमी आहे. कष्टाची भाकरच महाप्रसाद आहे. जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागाची पूजा करू नका, विसंगत व्यवहार सोडून द्या. निसर्गनियमाप्रमाणे देहधर्माप्रमाणे वागा. अनावश्यक देहाला त्रास देऊ नका. चारित्र्य सांभाळा. दासोह करा. गरजेपुरती संपत्ती बाळगू नका. फुकटचे कोणाला काही देऊ नका. फुकटचे कोणाचे काही घेऊ नका. दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी शिकवण बसवण्णांनी दिली. आम-आदमीने ती आत्मसात केली आणि आचरणात आणले.