विधानसभेची ‘लगीनघाई’, पण ‘भाऊ’च्या स्नेहभोजनाला सर्वपक्षीयांची ‘मांदियाळी’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत ‘तिकीट’ मिळवून भाजपमध्ये स्वतःचे स्थान आणि वर्चस्व अबाधित असल्याचे दाखवून मोठया मताधिक्क्याने विजयी होणाऱ्या खासदार गिरीश बापट यांनी विजयानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला मंगळवारी सर्वपक्षीयांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीला जेमतेम ८९ दिवसांचा कालावधी असताना या स्नेहभोजनामागे कोणते ‘टार्गेट ‘ याचीच चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

लोकसभा निवडणुकीत पुण्यात काँग्रेसचे पानिपत झाले आहे. इतकेच काय काँग्रेसचे अस्तित्व आता धोक्यात आले आहे. एककाळ पुण्यावर निर्विवाद वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसला आता तत्कालीन खासदार सुरेशभाई कलमाडी यांना पक्षातून ‘ हद्दपार ‘ केल्यानंतर जी घरघर लागली आहे,ती आता केवळ अस्तित्वापर्यंत पोहचली आहे. कार्यकर्त्यांची उणीव काँग्रेसला सद्यस्थितीत असली तरी नेमके या उलट भाजपमध्ये चित्र आहे.सद्यस्थितीत भाजपने शहरावर कब्जा केला असला तरी उपनगरात असलेली राष्ट्रवादीची ताकद कमी करून उपनगरांमध्ये मुसंडी मारली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजप व महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर होताच ते विजयी हेच सर्वपक्षीयांनी ठामपणे गृहीत धरले होते. त्यात काँग्रेसने उशिरा उमेदवारी जाहीर करून मोहन जोशी यांना रिंगणात उतरवले मात्र जोशी आणि बापट यांची राजकारणापलीकडे मैत्री आहे. त्यातही नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांचा सर्वपक्षीयांशी उत्तम संबंध आहेत आणि कुठे काय चालले आहे याचा आढावा ते वेळच्या वेळी घेत असतात.तसेच पालिका निवडणूक असो किंवा अन्य कोणत्याही निवडणूका ,त्यांच्याशी चांगला संबंध असणाऱ्यांना ते नेहमीच मदत करतात. त्यामुळे ‘भाऊ’चा जनसंपर्क दांडगा तर आहेच शिवाय राजकारण विरहित मैत्रीचे संबंधासाठी त्यांचे उदाहरण राजकीय क्षेत्रात आदर्शवत मानले जाते.

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल बापट यांनी मंगळवारी जंगली महाराज रस्त्याजवळील एका हॉटेलमध्ये स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. केवळ पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते नाही तर अन्य विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना, माजी नगरसेवक तसेच विद्यमान नगरसेवकांनाही यासाठी आमंत्रित केले होते.

मतदारसंघनिहाय या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज व्हा असा आदेश एकदिवस आधीच पुण्यातील कार्यक्रमात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी या स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आल्याने यंदाच्या निवडणुकीत भाजपचे नेमके ‘ टार्गेट ‘ काय याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात होत असली तरी ‘भाऊ’च्या प्रेमासाठी सर्वपक्षीयांची ‘मांदियाळी’ या स्नेहभोजनाला झाली होती.त्यात अन्य पक्षातील स्थानिक पदाधिकारी ‘पक्षांतर’ या हेतूनेही उपस्थित होते. त्यामुळे ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा ‘बिगुल’ वाजेल त्याचदिवसापासून पक्षांतराचा शुभारंभ होईल अशी दाट शक्यताही वर्तविली जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त
झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी