आज सायंकाळपासून शहर बससेवेच्या ‘शिवनगरी’ धावणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – यापूर्वी अनेकदा बंद पडलेली शहर बस सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. दीपाली ट्रान्स्पोर्ट या संस्थेमार्फत आज शहरात पुन्हा बससेवा सुरू होणार आहे. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरून ‘शिवनगरी’ बसगाड्या शहरातील रस्त्यांवर धावणार आहेत.

शहरात वर्षभरापासून नगर शहर बससेवा उपलब्ध नसल्याने नगरकरांची गैरसोय झाली होती. नागरिकांना खासगी अवैध वाहतुकीतून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. शहर बससेवेच्या तुलनेत चढ्या दराने आकारणी केली जात असल्याने शालेय विद्यार्थी, तसेच नागरिक त्रस्त झाले होते. यापूर्वीची बससेवा बंद पडल्यानंतर महापालिकेने नव्याने शहर बससेवा सुरू करण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. त्यात दीपाली ट्रान्स्पोर्ट अभिकर्ता संस्थेने दिलेली निविदा मान्य करण्यात आली आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत निविदेला मंजुरी देतानाच नवीन बसगाड्या असाव्यात, अशी अट घालण्यात आली होती. त्यानुसार अभिकर्ता संस्थेने नवीन दहा बसगाड्या आणल्या आहेत. पहिल्या टप्प्यात या बसगाड्यांमार्फत आज सायंकाळी पाच वाजल्यापासून शहर बससेवा सुरू होणार आहे.