‘पतंजली’ समूहाला लागली ‘दृष्ट’ ; विक्री झाली कमी, उत्पादनावरही झाला परिणाम

हरिद्वार : वृत्तसंस्था – बड्या बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान देऊन उद्योग क्षेत्रात उतरलेल्या रामदेव बाबा यांच्या पतंजली समुहाने अल्पावधीतच मोठी झेप घेतली आहे. तीन वर्षामध्ये त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांना टक्कर देऊन आपला ब्रॅंड सिद्ध केला आहे. मात्र, नियोजनातील चुका, देशभरात नियोजनाशिवाय सुरु केलेली आऊटलेट, विक्रीत झालेली मोठी घट यामुळे पतंजलीच्या साम्राज्याला आहोटी लागली आहे.

आपल्या योगसिद्धीच्या जोरावर रामदेव बाबा यांनी देशभरातील लोकांमध्ये आकर्षण निर्माण केले. त्यातून संपूर्ण भारतीय कंपनी म्हणून पतंजलीची प्रसिद्धी करण्यात आली. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वस्तू खरेदी करण्यापेक्षा पतंजलीच्या वस्तू खरेदी करुन विदेशी जाणारा पैसा थांबवा अशी जाहिरात करण्यात आली. चांगली उत्पादने आणि स्वदेशीचा रंग, त्याचबरोबर रामदेव बाबांचे आवाहन यामुळे पतंजलीने अल्पावधीत चांगलीच भरारी मारली. २०१६-१७ मध्ये पतंजलीची उत्पादने लोकप्रियतेच्या शिखरावर होती.

या उलाढालीचे आकडे बघून बहुराष्ट्रीय कंपन्यांना ‘कपालभाती’ करावा लागेल, असे वक्तव्य तेव्हा रामदेव बाबा यांनी केले होते. मार्च २०१८ च्या वित्त वर्षात कंपनीची विक्री २०० अब्ज रुपयांवर नेण्याची महत्त्वाकांक्षाही त्यांनी बोलून दाखविली होती. प्रत्यक्षात विक्री १० टक्क्यांनी घटून ८१ अब्जांवर आली असल्याचे कंपनीच्या अहवालात दिसते. गेल्या वर्षात विक्री आणखी घटली असेल अशी शक्यता आहे. ३१ डिसेंबरपर्यंतच्या पहिल्या नऊ महिन्यांतील विक्री अवघी ४७ अब्ज होती, असे कंपनी सूत्रांनी सांगितले.
कंपनीने उचललेली काही चुकीची पावले या पिछेहाटीस कारणीभूत असल्याचे दिसते.

पतंजलीचा विस्तार झपाट्याने झाल्याने कंपनीला इतर उत्पादकांकडून उत्पादने तयार करून घ्यावी लागली. त्यामुळे अनेक उत्पादनांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला. वाहतुकीसाठी कंपनीने दीर्घकालीन करार न केल्याने कंपनीचे नियोजन बिघडले. खर्चही वाढला. कंपनीकडे विक्रीवर देखरेख ठेवणारे आवश्यक सॉफ्टवेअर नाही. त्यामुळे वितरण व्यवस्था विस्कळीत झाली.

काही पुरवठादारांची बिले कंपनीने थकवली आहेत. त्याचाही परिणाम उत्पादनावर झाला आहे. देशभरात अनेक ठिकाणी चुकीच्या ठिकाणी व लोक ज्या भागात कमी येतात, अशा ठिकाणी पतंजलीने आऊटलेट काढली. दुसरीकडे किरकोळ दुकानदारांकडून मागणी असताना त्यांना वेळच्या वेळी मालाचा पुरवठा केला जात नव्हता. त्याचा परिणाम ग्राहकांची मागणी असतानाही त्यांना पतंजलीच्या वस्तू मिळत नव्हत्या. त्याचा परिणाम विक्रीवर झाला आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

घातक ! दूधासोबत चुकनूही खाऊ नका ‘हे’ ९ पदार्थ

गूळ-फुटाणे स्नायूंच्या मजबुतीसाठी आहेत फायदेशीर

डँड्रफ मुळापासून नष्ट करा; शॅम्पूमध्ये हे मिसळा

भात खाल्ल्याने वजन वाढते; खरं आहे का ?