पिंपरी-चिंचवडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत द्या, आ. लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना ऑगस्ट महिन्यांत आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना सरकारी मदत अद्याप मिळालेली नाही. पुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत. परंतु, तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही शहरातील पूरग्रस्तांना मदत न मिळणे हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे. त्याची तातडीने नोंद घेऊन या पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी जिल्हाधिकारी राम यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्ट महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागालाही पुराचा फटका बसला. विशेषतः शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीपात्राजवळील नागरी भागात पाणी शिरले. त्यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका तसेच त्या त्या भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मदतीने पाणी शिरलेल्या भागातील शेकडो नागरिकांना स्थलांतरित करून त्यांना आधार आणि दिलासा देण्याचे काम झाले.

परंतु, पुराचे पाणी या नागरिकांच्या घरात शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले. अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. प्रशासनाने या पूरग्रस्तांना सरकारी मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पूरग्रस्तांचा सर्व्हे, झालेले नुकसान, पंचनाम्याची प्रत आणि मदतीसाठी नागरिकांची लागणारी कागदपत्रे अशा सर्व बाबींची कार्यवाही आणि पूर्तता करण्यात आली होती. परंतु, तीन महिन्यांपासून अधिक काळ झाल तरी पिंपरी-चिंचवडमधील अनेक पूरग्रस्त नागरिकांना अद्यापपर्यंत तरी सरकारी मदत मिळालेली नाही. पुरामुळे संसार उद्‌ध्वस्त झालेल्या नागरिकांसमोर जगावे तरी कसे?, हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

अशा परिस्थितीत त्यांना शासकीय मदत करून त्यांच्या जगण्यात एक आशेचा किरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन पूरग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”

Visit : Policenama.com