राहुल कुल यांनी दौंड तालुक्याची वाट लावली : रमेश थोरात

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यामध्ये कोणतेही विकास कामे न केल्याने विरोधक कोणत्या मुद्यावर मत मागणार आहेत. मागील अठरा वर्षापासून दौड तालुक्याचे प्रतिनिधीत्व करीत असलेले राहुल कुल यांनी तालुक्याची वाट लावली आहे, असा आरोप पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी केला आहे.

राहुल कुल हे तालुक्यात आल्यापासून कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. हे तळागाळातल्या जनतेला माहित आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २८ हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या २५ मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास रमेश थोरात यांनी व्यक्त केला.

विरोधकांनी दोन वर्षात दौड तालुक्याची अत्यंत वाईट अवस्था केली आहे. भीमा पाटस कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे २६ महिन्यांपासून पगार नाहीत. जे सेवानिवृत्त झाले आहेत त्यांची चार वर्षापासूनची ग्रॅज्युटी, फंड आणि इतर येणी मिळालेले नाहीत. सरकारने ऊस शेतकऱ्यांसाठी ३ हजार ६०० कोटीचे पॅकेज दिले. कारखान्याने अठ्ठावीशे रुपये भाव देण्याचे कबूल केले मात्र, शेतकऱ्यांना यासाठी आठ महिने वाट पहावी लागली. अखेर शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर कारखान्याची साखर जप्त करण्यात आली. ही साखर विकून शेतकऱ्यांचे पैसे देण्यात आले.

त्यामुळे विरोधकांकडे कोणताच विकासाचा मुद्द सांगण्यासारखा नाही. तसेच दौड तालुका शरद पवारांना मानणारा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास देखील रमेश थोरात यांनी व्यक्त केला आहे.