भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास आयुष्यभर अनवाणी राहण्याची ‘या’ युवकानं घेतली शपथ

आलूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील विधानसभा निवडणूक होवून 10 दिवस उलटले आहेत. मात्र सरकार स्थापन झाले नाही. राज्यात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. भाजपचा झाला तर आयुष्यभर पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ उमरगा तालुक्यातील आलूरचे कट्टर शिवसैनिक सागर उमशेट्टी यांनी घेतली आहे.

आलूर येथील सामान्य कुटूंबातील सागर उमशेट्टी हा युवक मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहे. गावातील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. राज्यात मनोहर जोशीनंतर आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्याची वेळ आहे. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी सेना-भाजप दोघांमध्ये रस्सीखेच चालू असून त्यातच आलूर गावचे सुपूत्र सागर उमशेट्टी यांनी सोमवारी ग्रामदैवत सोमेश्वर देवाची शपथ घेतली.

भाजपशी जमत नसेल तर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून थेट शिवसेनेचा मुख्यमंत्री घोषित करावा. भाजप कार्यकर्त्यालाही वाटत आहे की, आमचाच भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा. शिवसेनेलाही वाटत आहे की, आमचा शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा. परंतु एक तरुण कट्टर शिवसेना समर्थक उमशेट्टी यांनी जोपर्यंत शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही, अशी शपथ घेतल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

Visit : Policenama.com