राष्ट्राला भगवं करा, पिवळं करा, हिरवं करा किंवा पांढरं करा, पण रोजगाराचा प्रश्न सोडवा : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्राला भगवं करा, पिवळं करा, हिरवं करा किंवा पांढरं करा, पण रोजगाराचा प्रश्न सोडवा असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी यांनी केले आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता –
मोदी सरकारच्या धोरणावर टीका करताना उदयनराजे म्हणाले की, ‘पाच वर्षांपूर्वी देशात लोकशाही होती. त्यावेळी आपलं मत व्यक्त करण्याची मुभा होती. आताची स्थिती सर्वांनाच ठावूक आहे. ईडी, आयबी याचा धाक दाखवल्यामुळे कोणी काहीच बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. ज्यांचं पोट तळहातावर होतं, त्यांचा रोजगार बंद झाला. पाच वर्षांपूर्वी काही कमी जास्त असेल, पण त्यावेळी लोकांकडे रोजगार तरी होता. आता कसा रोजगार मिळवून देणार तुम्ही. ज्यांनी नवे घर घेतले, त्यांच्याकडे हप्ते भरायला पैसे नाहीच. सगळ विस्कळीत झालं आहे. आगामी काळात बेरोजगारीमुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय काढा. पाच वर्षांपूर्वी जागतीक पातळीवर मंदी असताना भारतीयांना झळ बसली नव्हती. राष्ट्राला भगवं करा, पिवळं करा, हिरवं करा किंवा पांढरं करा, पण रोजगाराचं काही तरी पाहा.’

माझ्यासाठी एमपी म्हणजे मिलीटरी पोलिस –
उदयनराजे म्हणाले की विरोधक आरोप करतात की, ‘आमची दहशत आहे. पण आमची दहशत ही आदरयुक्त दहशत आहे. कुठेही अन्याय होत असेल तर मी धावून जाणारच. ‘सगळे म्हणतात, एमपी म्हणजे ‘मेंबर ऑफ पार्लमेंट’ पण माझ्यासाठी एमपी म्हणजे मिलीटरी पोलिस, असंही उदयनराजे यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज दाखल –
दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातुन उदयनराजे भोसले यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.