सुजय विखेंच्या विजयात आ. कर्डिलेंचा वाटा नाही ; नगर तालुक्यातील महाआघाडीच्या नेत्यांचा दावा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे यांच्या मताधिक्यात महाआघाडी आणि निष्ठावंत भाजपचा वाटा आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या यशात कोणताही संबंध नाही. त्यांना जनतेने नाकारले आहे, असा आरोप नगर तालुक्यातील महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

हॉटेल यश पॅलेस येथे झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, अनिल कराळे, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, तालुकाप्रमुख राजू भगत आदी उपस्थित होते. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

प्रा. गाडे म्हणाले की, नगर तालुक्यातील गावे श्रीगोंदा, पारनेर व राहुरी मतदारसंघात विभागली गेली असल्याने नगर तालुक्यातुन नक्की किती मताधिक्य कोणाला मिळाले हे दिसून येत नाही. आम्ही या तिन्ही मतदारसंघातील नगर तालुक्यातील गावांची आकडेवारी बाजूला केली आहे.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमधून डॉ. विखे यांना १२ हजार १०१, पारनेर विधानसभा मतदारसंघातील गावांमधून २२ हजार १३५ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गावांमधून १९ हजार ७२ मतांचे मताधिक्य आहे. नगर तालुक्यातील एकूण मताधिक्य हे ५४ हजार १४९ मतांचे आहे. सर्वाधिक मताधिक्य हे पाथर्डी तालुक्यातून ५४,८३५, नगर तालुका – ५४१४९, नगर शहर – ५२२८१, राहुरी – ३९२०८, शेवगाव – १९३८६, श्रीगोंदे – १८४९१, जामखेड – १६०४४, पारनेर – १४५७४, कर्जत – ८६२९ असे मताधिक्य आहे. नगर तालुक्यात जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य आहे.