नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुढील वर्षात मेट्रो सेवा प्रत्यक्ष सुरू होणाऱ्या शहरांमध्ये नागपूर, अहमदाबाद, गांधीनगर, नोएडा, पुणे आणि नवी मुंबई या शहरांचा समावेश आहे. नव्याने मेट्रो प्रकल्पाची आखणी होणाऱ्या शहरांमध्ये प्रामुख्याने कानपूर, विशाखापट्टणम, सुरत, गुवाहाटी, पाटणा, कोइमतूर, थिरूअनंतपुरम, इंदूर आणि वाराणसी आदींचा समावेश असल्याची माहिती केंद्रीय मंत्री हरदीपसिंह यांनी दिली आहे.
बळीराजाने सरकारला एक दमडीचीही अोवाळनी देऊ नये : राज ठाकरेंचे आणखी एक व्यंगचित्र
केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सध्या देशातील विविध शहरांमध्ये मेट्रोचे जाळे ५१५ किलोमीटरचे असून, नव्याने मेट्रो सुरू होणाऱ्या शहरांमधील अंतर एकून ६६४ किलोमीटर असेल. सध्या कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, जयपूर, गुडगाव, मुंबई, कोची आणि लखनऊ या शहरांमधील मेट्रो कार्यान्वित झाली आहे. देशातील पहिली मेट्रो १९८४ मध्ये कोलकात्यात सुरू झाली. आगामी काळात देशातील आणखी १५ शहरांमध्ये मेट्रो धावणार आहेत.
पुढील वर्षी नागपूर, अहमदाबाद, गांधीनगर, नोएडा, पुणे आणि नवी मुंबई या शहरांमध्ये मेट्रो धावणार असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले असले तरी आता काही दिवसांतच सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यानंतर मेट्रोचे काम कोणत्या गतीने होईल, याबाबत आताच ठामपणे सांगता येणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे केंद्रिय मंत्र्यांच्या या महितीनुसार खरोखरच पुढील वर्षी या शहरांमध्ये मेट्रो धावेल का, या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष मेट्रो धावल्यानंतरच मिळणार आहे.