खा. विनायक राऊतांनी कोकणात बालवाडी तरी आणली का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोकणात नारायण राणेंनी मेडिकल कॉलेज आणले, उद्योग आणले, अनेकांना रोजगार मिळवून दिला. खा. विनायक राऊतांनी बालवाडी तरी आणली का? राऊतांना केवळ आरोप करता येतात. त्यांना त्यासाठीच पाठवले आहे. ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लाटेत निवडून आले आहेत, अशी टीका करत माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. खा. राऊतांनी फक्त आरोप करण्याचाच अजेंडा उचलला असून ते विकृत आहेत, असा पलटवार निलेश राणे यांनी केला आहे. ते चिपळूण येथे बोलत होते.

विनायक राऊतांनी केला होता गौप्यस्फोट
नारायण राणे हे भाजपमध्ये का गेले याचा गौप्यस्फोट विनायक राऊत यांनी केला होता. तत्कालीन काँग्रेसचे व सध्याचे भाजपचे आमदार राणे सुपूत्र नितेश राणे यांनी मुंबईतील एका व्यक्तीला 12 कोटींना फसविल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात धाडणार होते, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता.