मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र निलेश राणे हे नेहमीच चर्चेत असतात. यावेळी निलेश राणे लोकसभेच्या रिंगणात आहेत, मात्र २०१४ च्या प्रचंड पराभवानंतर ही लोकसभा निवडणूक राणेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणेंचा पराभव केला. त्यामुळे यावेळी निलेश राणे यांनी आक्रमक होत शिवसेनेवर आपले बाण सोडले होते. त्यामुळे आता निलेश राणे जिंकणार हि पुन्हा त्यांचे पानिपत होणार हे पाहणे फार महत्वाचे आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात यावेळी काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, शिवसेनेकडून विनायक राऊत तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे मैदानात आहेत. सर्व उमेदवार आम्हीच जिंकणार असे सांगत असले तरी मात्र काल आलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र निलेश राणेंचा पराभव होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष मतमोजणीच्या दिवशी काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राणेंचे राजकारण धोक्यात
या निवडणुकीत जर राणेंचा प्रभाव झाला तर त्यांचे राजकीय करियर धोक्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना या निवडणुकीत विजय आवश्यकच आहे. या पराभवाने राणेंची कोकणातली पकड देखील सैल होण्याची शक्यता आहे. जर शिवसेनेचे राऊत विजयी झाले तर नारायण राणे भाजपविषयी काय भूमिका घेतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.