नीलेश राणेंनी आपली लायकी ओळखून बोलावे- आनंदराव अडसूळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणाविषयी नीलेश राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर आरोप केले होते.त्यांच्या या आरोपांवरून खासदार आनंदराव अडसूळ यांनी नीलेश राणेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.

ठाणे येथील शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी निलेश राणे यांनी केलेले आरोप धादांत खोटे असून त्यांची लायकी काय? आनंद दिघे यांचा मृत्यू झाला तेव्हा निलेश राणे 10-12 वर्षांचे होते. इतक्‍या वर्षानंतर ते या संदर्भात बोलत आहेत.नीलेश राणेंनी आपली लायकी ओळखून बोलावे, असं अडसुळ यांनी म्हटलं.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांचे दैवत आहे. त्यांच्याविषयी असे बोलणे शिवसैनिक सहन करणार नाहीत.नीलेश राणे यांनी तोंड सांभाळून बोलावे, असं आनंदराव अडसुळ यांनी म्हटलं आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती होणार का?, या प्रश्नावर अडसुळ यांनी युतीबद्दलचा खुलासा केला आहे. युती संदर्भात भाजपशी अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. या स्थितीमध्ये भाजपच्या नेत्यांनी युतीसंदर्भात अफवा पसरवू नये. भाजपचे नेते युती संदर्भात विविध विधाने करीत आहेत. भाजप युतीसाठी तयार आहे परंतु सेना प्रतिसाद देत नसल्याची विधाने केली जात आहे, असं अडसुळ यांनी म्हटलं.

दरम्यान, प्रत्यक्षात मात्र भाजपकडून युतीबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. किंवा शिवसेनेने भाजपकडून प्रस्ताव मागितलेला नाही. ही वस्तुस्थिती असताना भाजपचे नेते मुद्दाम युती संदर्भात विधाने करून संभ्रम निर्माण करीत आहे, असं अडसुळ यांनी म्हटलं