‘राष्ट्रवादी’चे 9 आमदार ‘भाजप’च्या संपर्कात ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 9 आमदार आपल्या संपर्कात अससल्याचा दावा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढ्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

रणजितसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले की, ‘राष्ट्रवादीचे राज्यातील नऊ आमदार माझ्या संपर्कात आहेत. तसेच शरद पवारांना कोणतीही ईडीची नोटीस देण्यात आली नव्हती. जनतेचा कौल हा महायुतीला असून, शिवसेना- भाजप एकत्र येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी विधानसभा प्रचाराच्या वेळी प्रत्येक सभेत भाजपचा मुख्यमंत्री होणार असे सांगत होते. त्यावेळी शिवसेनेने आक्षेप घेतला नाही. परंतु निकाल लागताच मुख्यमंत्री पदासह 50- 50 असा दावा केला. खरे तर ते अन्य पदासाठी ठरले होते, मुख्यमंत्री पदासाठी नव्हते. राष्ट्रपती राजवट लागली हे प्रादेशिक पक्षांची जबाबदारी असून महायुतीला जनादेश मिळाला आहे. यास भाजप जबाबदार नाही. ‘

भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झाली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी आता नवी समीकरणं जुळत असल्याचं दिसून येत आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

Visit : Policenama.com