निर्भया केस : दोषी पवननं शेवटचा मार्ग स्विकारला, राष्ट्रपतींकडे पाठवली दया याचिका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी पवनने फाशी टाळण्याचा अखेरचा मार्ग निवडला आहे. सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटिव्ह याचिका फेटाळल्यानंतर पवनने काही वेळातच राष्ट्रपतींकडे दया याचिका पाठवली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयनंतर निर्भयाच्या दोषींचे सर्व कायदेशीर मार्ग बंद झाले होते, यादरम्यान पवनने राष्ट्रपतींकडे दया याचिकेसाठी अर्ज केला आहे. दोषी पवनचे वकील एपी सिंह म्हणाले, दुपारी 12 वाजता दया याचिका पाठवली होती. यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने चारही दोषींविरोधात 3 मार्चला डेथ वारंट जारी केले होते.

निर्भया सामूहिक आणि हत्या प्रकरणात दोषी पवन गुप्ता याची क्यूरेटिव्ह याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. पवनच्या या याचिकेवर पाच न्यायाधीशांच्या पीठाने सुनावणी करण्यात आली. ज्यात न्यायाधीश एन.वी. रमण, न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश आर.एफ. नरीमन, न्यायाधीश आर भानुमति आणि न्यायाधीश अशोक भूषण हे सहभागी होते.

फाशीची शिक्षा जन्मठेपीत बदलण्याची विनंती –
दोषी पवनने गुन्ह्यावेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्यामुळे फाशीची शिक्षा कमी करुन ती जन्मठेपीत बदलण्याची विनंती त्याने केली होती, पवनचे वकील एपी सिंह म्हणाले, क्युरेटिव्ह याचिका दाखल करुन या प्रकरणातील याचिका आणि पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयला रद्द करण्याची विनंती केली होती.

डेथ वॉरंट जारी –
16 डिसेंबर 2012 साली धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती आणि दोषींनी निर्भयाला भयानक परिस्थितीत बसमधून बाहेर रस्त्यावर फेकले होते. एक आठवडा उपचार केल्यानंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या केसमध्ये दोषींच्या विरोधात डेथ वारंट जारी केले गेले आहे. त्यानुसार 3 मार्चला दोषींना फाशी होईल.