वादळातही गाडीतून प्रवास करत असाल तर जवळ ठेवा ‘हातोडा’ : बीएमसीची सूचना, ‘हे’ आहे कारण
पोलिसनामा ऑनलाईन – निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कार-जीप इत्यादी वाहनाने प्रवास करताना खबरदारीची उपाययोजना म्हणून सोबत हातोडा ठेवण्याची सूचना मुंबई महानगरपालिकेने वाहनचालकांना केली आहे. पाण्यात गाडी अडकल्यास किंवा ऑटो लॉक सिस्टिम बंद पडल्यास सोबत काच फोडण्यासाठी एखादे साधन ठेवावे असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे.
अतिवृष्टी दरम्यान 26 जुलै 2005 मध्ये काही चार चाकी वाहनांच्या स्वयंचलित लॉक सिस्टिममध्ये पाणी गेल्यामुळे यंत्रणा बंद पडली होती. परिणामी गाडीचे दरवाजे व खिडक्या उघडता न आल्याने काही नागरिकांचे मृत्यू झाले होते. गेल्या वर्षी 2019 च्या पावसात देखील अशीच एक घटना घडली होती. त्यामुळे अत्यंत महत्वाच्या कारणासाठी चारचाकी वाहनाने प्रवास करणार्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहनात काच फोडता येईल, असे साधन ठेवण्याची सूचना महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडावयाचे झाल्यास व चारचाकी वाहनाने प्रवास करावयाचा झाल्यास खबरदारीची उपाययोजना म्हणून प्रवास करण्यापूर्वी गाडीमध्ये काच फोडता येईल, असे हातोडा, स्टेपनी पान्हा यासारखे एखादे साधन ठेवण्यास विसरू नये. तसेच हे साधन गाडीच्या डिकीत न ठेवता गाडी चालकाला सहजपणे हाताला लागेल अशाप्रकारे ठेवावे; असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. बुधवार सकाळपर्यंत त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती आहे. यामुळे संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.