निसर्ग चक्रीवादळ काही तासांत ‘या’ किनाऱ्यावर धडकणार, मुंबईतही रेड अलर्ट

मुंबई, पोलीसनामा ऑनलाईन : निसर्ग चक्रीवादळ अलिबागच्या दिशेनं येत असून आज (बुधवारी) सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान हे वादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचे समजते. या चक्रीवादळाचे संकेत दिसू लागले आहेत. कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा वेग प्रचंड वाढला आहे, मालवण वेंगुर्ले गुहागर वेळास रत्नागिरी किनारपट्टीवरही वेगाने वारे वाहत आहे. तसेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे.

मुंबईसह उपनगरांमध्येही बुधावारी पहाटेपासूनच वेगानं वारे वाहात आहेत. माहितीनुसार हे वादळ जेव्हा किनारपट्टीवर धडकेल, तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर असेल. तसेच तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांदाच मुंबईला मोठे वादळ आणि मुसळधार पावसाचा सामना करावा लागणार आहे. अलिबाग, ठाल नव्हंगाव आणि किहीम समुद्रकिनाऱ्याला या निसर्ग वादळाचा मोठा फटका बसणार आहे.

नुकताच मिळालेल्या माहितीनुसार सध्या हे चक्रिवादळ अलिबाग समुद्रकिनाऱ्यापासून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी 11 वाजता किनाऱ्यावर धडकणाऱ्या या चक्रिवादळाचा सामना करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. दरम्यान किनाऱ्यालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. तसेच, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधील अनेक ठिकाणी मंगळवारपासूनच वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. ‘3 आणि 4 जून हे दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहे. दोन्ही दिवस सर्व नागरिकांनी घरातच थांबावे. कोणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.