२०१४ सालच्या राणे पराभवाचा नितेश राणेंनी केला खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – २०१४ साली निवडणुकीच्या तोंडावर आमच्याबद्दल चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुका सुद्धा आमच्यावर लादण्यात आल्या त्यामुळे आमची प्रतिमा मलीन झाली. अशा सर्व घडामोडीतूनच २०१४ साली निवडणुकीमध्ये अपयश आले असे मत निलेश राणे यांनी व्यक्त केले आहे.

एका मराठी वृत्तपत्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुलाखत देताना नितेश राणे यांनी आपली भूमिका मांडली आहे. भाजपची विजयी यात्रा सुरु असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हापरिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती राणेंनी ताब्यात ठेवल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला २०१४ नंतर कळाले कि आपल्याला राणेंशिवाय पर्याय नाही. राणे कोणताही निर्णय घेतात तो जनतेच्या हिताचा असतो हे आता लोकांना पटले आहे. त्यामुळे यापुढे सिंधुदुर्गची जनता राणेंच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

देशाच्या राजकारणात तरुणांची भूमिका आगामी काळात महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे तरुणांना सोबत घेऊन आम्ही काम करत आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षासाठी लोकसभेची पहिली निवडणूक अत्यंत महत्वाची वाटते कारण हीच निवडणूक आमचे राज्याच्या राजकारणातील स्थान निश्चित करणार आहे असे नितेश राणे म्हणाले आहेत.