आमच्यामुळेच प्रियंका गांधी यांची जलयात्रा पूर्ण

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी १४० किमीची गंगा यात्रा पूर्ण केली. या दौऱ्यावरुन प्रियंका गांधी यांच्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांची गंगायात्रा आम्ही जलमार्ग तयार केले नसते तर झाली असती का ? असा सवाल नितीन गडकरी यांनी प्रियंका गांधी यांना केला आहे. .

प्रियंका गांधी यांच्या गंगा यात्रेविषयी गडकरी म्हणाले की , आमच्या सरकारने प्रयागराज ते वाराणसी जलमार्ग बांधला नसता तर प्रियंका यांना गंगा यात्रा करता आली असती का ? तसेच प्रियंका गांधी गंगा नदीतील पाणीदेखील प्यायल्या, म्हणजे नदी स्वच्‍छ आहे. युपीए सरकारच्या काळात तुम्ही हे काम केलं नाही, ते काम आम्ही केले. मार्च २०२० पर्यंत गंगा नदी पूर्णपणे स्वच्छ झालेली असेल असा दावाही नितीन गडकरी यांनी केला

प्रियंका गांधी यांनी आज प्रयागराज येथून ‘गंगा यात्रा’ सुरू केली होती. प्रियंका गांधी नौका यात्रेनंतर आता रेल्वेनं लोकांशी संपर्क साधणार आहेत. लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी असलेल्या प्रियंका गांधी २७ मार्चला दिल्ली ते फैजाबाद दरम्यान रेल्वे यात्रा करणार आहेत.