नितीन गडकरी आज VC द्वारे पहिला ‘सुरूंग’ स्फोट करणार, ‘अटल’नंतर आता ‘जोजिला’ टनेल बनणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाला महत्त्वाचा अटल टनेल मिळाल्यानंतर आता केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरकडे मोर्चा वळवला आहे. देशहितासाठी आणि संरक्षणासाठी महत्त्वाचा असलेला आणखी एक बोगदा निर्माण प्रक्रिया सुरू होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे पहिला सुरूंग स्फोट करणार आहेत. भारतीय सैन्य आणि सिव्हील इंजिनिअर यांची टीम जोजिलाच्या दरीला पोखरून बोगदा बनवणार आहेत.

नितीन गडकरी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. या बोगद्याचं काम अशा वेळी सुरू होत आहे जेव्हा चीनसोबत लडाखमध्ये गेल्या 5 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तणावाचं वातावरण आहे. गडकरींनी सांगितलं की, हा बोगदा बनवल्यानंतर श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेहच्या भागात कोणत्याही सीजनमध्ये वाहतूक सुरू राहणार आहे. तसंच प्रवासाचा वेळही सव्वा तीन तासांनी कमी होणार आहे.

हा टनेल बनल्यानंतर भू स्खलनाची भीती दूर होणार आहे. यामुळं श्रीनगर ते लहे हा प्रवास राष्ट्रीय हायवेवरून कोणत्याही धोक्याशिवाय करता येणार आहे. या प्रकल्पांतर्गत 14.15 किमी लांब टनेल बनवला जाणार आहे. याशिवाय 18.63 किमी लांबीचा ॲप्रोच रोडदेखील तयार केला जाणार आहे. या प्रकल्पातून 32.78 किमी लांबीचा रस्ता बनवला जाणार आहे.

या सर्व प्रकल्पसाठी 6808.63 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. बोगद्याच्या निर्माणासाठी 6 वर्षांचा वेळ लागणार आहे. तर अॅप्रोच रोड बनवण्यासाठी 2.5 वर्षे लागणार आहेत. दोन्ही कामं एकाच वेळी करण्यात येणार आहेत.

जोजिला दर्रा हा रस्ता जगातील सर्वात खतरनाक रस्त्यांपैकी एक मानला जातो. या दुर्गम रस्त्यावर वाहनं चालवणं खूप जिकीरचं आहे. हा बोगदा तयार झाला की, लेह, लडाख, कारगिल, द्रास आणि सियाचिन वर्षभर देशासोबत जोडलेला राहणार आहे. सध्या या भागात 6 महिनेच वाहतूक सुरू असते. बर्फवृष्टीमुळं येथील रस्ता बंद असतो. या बोगद्यामुळं ही समस्या दूर होणार आहे. तसंच सैन्याची वाहतूकही जलद आणि सोपी होणार आहे.