राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव !

पोलिसनामा ऑनलाईन – कृषी विधेयकांवर चर्चा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळून सभागृहाचे कामकाज नियोजित वेळेनंतरही सुरु ठेवल्याने संतापलेल्या 12 विरोधी पक्षांनी राज्यसभा उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव सादर केला. त्यामुळे उपसभापती हरिवंश यांच्याविरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत.

कृषी विधेयकांविरोधात मत मांडू इच्छिणार्‍या विविध पक्षांच्या सदस्यांना उपसभापतींनी बोलूही दिले नाही. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास नसल्याने हा ठराव मांडण्यात येत असून, त्यांना पदावरून हटविण्याची मागणी करण्यात येत आहे”, असे ठरावात म्हटले आहे. या ठरावावर निर्णय होईपर्यंत हरिवंश हे उपसभापतीपदाचे कामकाज पाहू शकत नाहीत, असेही विरोधकांनी म्हटले आहे. ठरावास काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, माकप, भाकप, राजद, आप, तेलंगण राष्ट्र समिती, सप यांनी पाठिंबा दिला आहे. भाजप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष, अण्णाद्रमुक आणि वायएसआर काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी दोन्ही कृषी विधेयके प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भातील ठरावावर उपसभापती हरिवंश यांनी मतदान घेतले नाही आणि आवाजी मतदानाने विधेयके मंजूर केली. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्यसभेत बहुमताने ठराव मंजूर केल्यास उपसभापतींना पदावरून हटवता येते. मात्र, त्यासाठी ठरावाबाबत 14 दिवस आधी नोटीस देणे आवश्यक असते. मात्र, विरोधकांनी उपसभापतींविरोधात उचललेले पाऊल अभूतपूर्व असल्याचे मानले जाते. आतापर्यंत राज्यसभेच्या उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आल्याचे माझ्या पाहण्यात तरी आलेले नाही, असे लोकसभेचे माजी महासचिव पी. डी. टी. आचारी यांनी सांगितले.