‘ड्रॅगन’चा डबल गेम ?, बाहेर नरमाईचे संकेत पण सीमेवर सैनिक संख्या कायम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सीमा वादामध्ये चीनने थोडी नरमाईची भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील स्थितीमध्ये काहीही फरक पडलेला नाही. पूर्व लडाखमधील गालवान व्हॅली आणि पँगाँग टीएसओ भागामध्ये चार ठिकाणी दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहे. या ठिकाणी तणावाची स्थिती अद्यापही कायम आहे.

चीन आणि भारत या दोन्ही देशांचे सैनिक आपआपल्या जागेवर ठामपणे उभे आहेत. परिस्थिती निवळून सामान्य कधी होईल ते आताच सांगता येणार नाही असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सुत्रांनी एका हिंदी वृत्तपत्राला सांगितले. भारतालगत सीमेवर परिस्थिती स्थिर व नियंत्रणात असून दोन्ही देशांत संवाद व सल्लामसलतीच्या मार्गाने प्रश्न सोडवण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहेत, असे चीनने बुधवारी म्हटले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी नरमाईचे संकेत दिले होते. मात्र प्रत्यक्षात ते ग्राऊंड लेव्हलवर दिसलेले नाहीत. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी भारतीय आणि चिनी सैन्य आमने-सामने असून गालवान व्हॅली जवळ तीन भागांमध्ये आणि पँगगाँग तलावाजवळ एका ठिकाणी संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. भारताकडून सीमेवर सुरु असलेल्या पायाभूत सोयी सुविधांच्या कामकाजात खोडा घालण्यासाठी चीनने या ठिकाणी सैनिकांची संख्या वाढवली आहे.

गालवान नदीजवळ भारत 60 मीटरचा पूल उभारत आहे तसेच पँगगाँग तलावाजवळील टेहळणी पोस्टचे कामकाज भारताने थांबवावे यासाठी चीनचे प्रयत्न सुरु आहेत. भारताने मात्र, चिनच्या या दबावाच्या खेळीला न जुमानता आपले कामकाज चालूच ठेवले आहे. गालवान नदीजवळचा पूल हा दौलत बेग ओल्डी पर्य़ंत पोहचण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या 255 किलोमिटरच्या मार्गाचा एक भाग आहे.