Uddhav Thackeray : राज्यात पुन्हा लाॅकडाऊनची गरज नाही; पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘राज्यात पुन्हा लॉकडाऊनची गरज मला वाटत नाही. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत हे विसरुन चालणार नाही’, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दुपारी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की राज्यात पूर्ण नाही, पण काही प्रमाणात नक्कीच संसर्गाला अटकाव करण्यात यश आलं आहे. सावध राहा हे माझं कुटुंब प्रमुख म्हणून सांगणं काम आहे. आता थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे थंडीचे आजार वाढ घेत आहेत. त्यामुळे आजारी पडून इलाज करण्यापेक्षा काळजी घेतलेली बरी. पुढील किमान ६ महिने मास्क वापरणं बंधनकारक राहणार आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग एअरपोर्टचं काम खरंतर एव्हाना पूर्ण होणं अपेक्षित होतं. पण लॉकडाउनमुळे विदेशातून येणारी यंत्रसाम्रगी येऊ शकली नाही. त्यामुळे काम रखडलं होतं. ते काम आता पूर्ववत झालं आहे. विकासकामांना वेग देण्याचं काम सरकारकडून केलं जात आहे”, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

कोविडचा काळ असूनही महाविकास आघाडी सरकारने आव्हानांना तोंड देत राज्यात विकासकामांना खंड पडू दिला नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विकास कामांची माहिती जनतेला दिली. समृद्धी महामार्ग, सिंधुदुर्ग विमानतळ, मुंबईतील कोस्टल रोड आणि कोयना धरण प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. समृद्धी महामार्गाचं काम मी स्वत: पाहून आलो. त्यानंतर कोयना धरणावरील प्रकल्पाचीही पाहणी केली.

कोरोनाला ‘यायचं हं…’ म्हणू नका”,

लग्नसराई, ख्रिसमस आणि नववर्ष स्वागताचा काळ असल्यामुळे गर्दी वाढल्याने कोरोना वाढीची शक्यता असल्याच्या मुद्द्यावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. “ख्रिसमस, लग्नसराई आणि नववर्ष असल्यानं मास्क काढून सेल्फी काढले जातील, गर्दी वाढेल. पण असं निष्काळजीपणे वागून चालणार नाही. लग्नात आप्तेष्टांना ‘यायचं हं…’ म्हणण्याची पद्धत आहे. पण या लग्नसराईत गर्दीकरुन कोरोनाला ‘यायचं हं…’ म्हणू नका”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

राज्याला येणारा निधी थकीत

लॉकडाउनमुळे राज्याच्या तिजोरीत आर्थिक चणचणी आहे हे अगदी खर आहे. इतर कशाचंही सोंग घेता येतं. पण पैशाचं सोंग आणता येत नाही. असं असतानाही आपण रडत बसलेलो नाही. राज्याच्या हिताचे प्रकल्प व्हायलाच हवेत यासाठी कितीही परिश्रम करण्याची सरकारची तयारी आहे, असं सांगताच उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडून राज्याला येणारा निधी थकीत असल्यावरही पुन्हा एकदा बोट ठेवलं.