भाजपकडे लक्ष देण्याची गरज नाही, जिंकणार आम्हीच : जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. विविध पक्ष आपल्या पद्धतीने प्रचार करत असून, महाविकास आघाडी ( Mahavikas Aaghadi) आणि भाजपमध्ये ( BJP) काट्याची टक्कर होत आहे. त्यावर आता राज्याचे मंत्री जयंत पाटील ( Jayant Patil) यांनी भाष्य केले असून, आम्हीच जिंकणार आहोत, भारतीय जनता पार्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही, सहकारी पक्षाला वाइट वागवण्याची पद्धत त्यांची आहे, आमची नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) प्रदेशाध्यक्ष, आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस ( Congress) भवनमध्ये शुक्रवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ( Shivsena) अशी संयुक्त बैठक झाली. जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजित कदम हे मंत्री, खासदार, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

राज्याचे ऊर्जा खाते काँग्रेसकडे असल्याने राष्ट्रवादी वीजबिले माफ करायला तयार नाही. या भाजपच्या आरोपावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, सहकारी पक्षाला भाजप कसा वागवतो ते मागील ५ वर्षांत शिवसेनेला त्यांनी दिलेल्या वागणुकीवरूनच दिसले. आमची तशी पद्धत नाही. मुख्यमंत्री ठाकरे सर्वसहमतीनेच प्रत्येक निर्णय घेतात. फडणवीसांच्या सत्ताकाळातच महावितरणची थकबाकी ६७ हजार कोटी झाली. आम्ही यासाठी प्रयत्न करत असून, ग्राहक आणि महावितरण दोन्हींच्या हिताचा आम्ही विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. मागील ५ वर्षांत धोरणात्मक निर्णय केंद्र, राज्य सरकारने घेतले नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट कोविडच्या आधीच आले होते, असे पाटील म्हणाले. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या निवडणुका अजून लांब असून, त्यांचा विचार लगेच न केल्याचेदेखील त्यांनी यावेळी म्हटले. पराभव होणार हे पक्के माहिती असणारेच “आम्ही त्यांना चितपट करू” वगैरे बोलतात. देवेंद्र फडणवीस यांचे तेच सुरू आहे, प्रयत्न करत असतील तर करू द्या, ते फार गंभीरपणे घ्यायची गरज नसल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी दुसऱ्या लाटेमुळे अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. विविध जिल्ह्यांतील स्थानिक प्रशासनाला त्यासंदर्भात अधिकार घेण्याची सूट सरकारने दिली असल्याची माहितीदेखील त्यांनी यावेळी दिली. मुंबईत अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबईत बसून यवतमाळचा निर्णय कसा घेणार इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही या टीकेला काही अर्थ नसल्याचेदेखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.