देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर ‘खरमरीत’ टीका, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून माफी मागण्यास ठाम नकार देणाऱ्या राहुल गांधींचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. राहुल गांधी हे सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाहीत. स्वत:ला गांधी समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करु नये. केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी गांधी होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये फडणवीस म्हणाले, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विधान अतिशय निंदनीय आहे. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही आणि स्वत:ला गांधी समजण्याची घोडचूक तर त्यांनी अजिबात करू नये ! केवळ आडनाव गांधी असल्याने कुणी गांधी होत नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे !

महिलांवर होणाऱ्या आत्याचारांवरून सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना भाजपकडून लोकसभेत लक्ष करण्यात आले होते. तसेच राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी भाजपकडून केली. भाजपच्या या मागणीचा राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी सावरकरांचे नाव घेऊन केंद्र सरकारला डिवचले होते. राजधानी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित काँग्रेसच्या भारत बचाव सभेत ते बोलत होते.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/