पटोलेंचा राजीनामा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न, त्यावर कुणीही नाराज नाही – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाविकास आघाडीत नाराजी असल्याची चर्चा रंगली होती. मात्र पटोले यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यावर कुणीही नाराज नाही. त्यांनी जर अधिवेशन झाल्यानंतर राजीनामा दिला असता तर अधिक बरे झाले असते. त्यांची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच येत नसल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुण्यात पत्रकारांशी बोलतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज्यात दोन उपमुख्यमंत्री पद असण्याचा प्रश्नच नाही. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना समसमान कार्यक्रम तयार केला आहे. त्यामुळे फॉर्मुला आधीच ठरलेला आहे, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पुन्हा एकदा पवार यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबईत पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी एकच प्राधिकरणाबद्दल भूमिका मांडली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी नाराज आहे का असे पत्रकारांनी विचारले असता, पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जस सांगतील तस होईल. मुंबई पालिकेचे आयुक्त इकबाल चहल त्याविरोधात बोलू शकत नाहीत त्यांना तिथेच राहायचे ना?’ असे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला कर कमी केले तर पेट्रोलच्या दरात कपात करता येईल, असा सल्ला दिला होता. त्यावर पवार म्हणाले की, आधी केंद्रातले कर कमी करा मग राज्य सरकार विचार करेल असा टोला त्यांनी लगावला.