मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात असून शेवटच्या टप्प्याआधी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमधील वातावरण चांगलच तापलं आहे. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारमागे भाजपचा हात असून, पराभव समोर दिसत असल्याने भाजप मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको अशी प्रतिक्रिया आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट करत दिली आहे.
पराभव समोर दिसत असल्याने भाजपा मुद्दाम आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण करत आहे. येत्या काळात भाजपाने औपचारिक आणीबाणी जाहीर केली तर आश्चर्य वाटायला नको.#WestBengalClashes #WestBengal
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 16, 2019
आपल्या ट्विटमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा दंगली घडवत आहे, असा आजपर्यंतचा इतिहास आहे. पश्चिम बंगालमध्ये घडलेला हिंसाचार हा भाजपाप्रेरित असल्याचे वेगवेगळ्या पुराव्यांवरून स्पष्ट होते आहे. या सर्व बाबीतुन सत्ताधारी पक्ष काय सिद्ध करत आहे. पंडित विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना भाजपा कार्यकर्त्यांनी केल्याचे व्हिडियोमध्ये स्पष्ट दिसत आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.