प्रत्येक नागरिकाला महिन्याला 1 हजार रूपये द्या, अभिजित बॅनर्जींचा सरकारला सल्ला
पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याचा फटका सर्वसामान्य कामगारांना बसला आहे. हातावर पोट असलेल्यांना मोठ्या प्रमाणात संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत सरकारला थेट गरीबांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची आवश्यकता असल्याचे मत अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.
अभिजित बॅनर्जी इस्टर डुफ्लो या जयपूरमधील ऑनलाइन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. कोरोनाच्या संकटकाळादरम्यान सरकारला प्रत्येक भारतीला किमान 1 हजार रुपये त्वरित दिले पाहिजे. त्याशिवाय पुढील काही महिने ही रक्कम भारतीयांना दिली पाहिजे, असे मत त्यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले. ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजनादेखील सरकाराने लवकरात लवकर लागू केली पाहिजे.
सरकारला युनिव्हर्सल अल्ट्रा बेसिक इन्कम तात्काळ लागू करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, जोपर्यंत लस तयार होत नाही तोपर्यंत कोरोनाचे संकट कायम राहणार असल्याचे मतही अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे. भारतात सध्या मागणीची मोठी समस्या आहे. लोकांच्या हाती सध्या पैसा नाही हे त्यामागील कारण आहे. त्यामुळेच लोक काहीही खरेदी करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांपर्यंत आर्थिक मदत पोहोचवण्यात उशिर करणे चुकीचे ठरू शकते. लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत यासाठीच त्वरित आर्थिक मदतीची अधिक गरज असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे.