नागरिकत्व दुरूस्ती विधेयक : आसाममध्ये पोलिसांचा ‘गोळीबार’, ‘इंटरनेट’ बंद, पोलिस आयुक्तांना ‘तात्काळ’ हटवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन आसाम, त्रिपुरासह इशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव आहे. नागरीक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन हिंसक पद्धतीने या विधेयकाविरोधात प्रदर्शन करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्करही तैनात करण्यात आले असून वातावरण मोठ्या प्रमाणात चिघळले आहे.

या अनुषंगाने आसाम मध्ये अनेक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान या विधेयकाच्या विरोधात देशभर काही ठिकाणी आंदोलने होत आहेत तर काही ठिकाणी आनंद साजरा होत आहे. मात्र इतर राज्यांच्या मानाने आसाम, त्रिपुरासह इशान्येकडच्या अन्य राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आसाममध्ये पुढील ४८ तासांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांना पदावरून हटवण्यात आले असून मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी त्यांच्याजागी पदभार स्वीकारला आहे.

या हिंसक आंदोलनामुळे इशान्येकडील राज्यामधील हवाई सेवा आणि रेल्वे सेवेला देखील फटका बसला आहे.

आंदोलकांकडून धाकुआखाना, लखीमपूर जिल्ह्यातील भाजपा आणि आसाम गण परिषदेचे कार्यालय पेटवण्यात आले.

या आंदोलनामुळे अनेक खासगी विमान कंपन्यांनी कोलकाताहून आसामला जाणारी विमाने आणि इतर इशान्येकडच्या राज्यांमध्ये जाणारी विमाने रद्द केली आहेत.

या आंदोलनाच्या हिंसक वळणामुळे आसाम आणि त्रिपुरामधील लोकल ट्रेनच्या सेवा देखील बंद करण्यात आल्या आहेत.

गुवाहाटीमध्येही अनेक नागरीकांनी संचारबंदी झुगारुन रस्त्यावर उतरत हिंसक आंदोलन केले. शेवटी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या गोळीबारात चार जण जखमी झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

आंदोलनामुळे आसाम रायफलच्या जवानांना बुधवारी त्रिपुरामध्ये तैनात करण्यात आले.

गुवाहाटी शहर हे आंदोलनाचे मुख्य केंद्र आहे त्यामुळेच आसामच्या चार भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात आले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरुन संपूर्ण आसाममध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली असून लष्कराने गुवाहाटीमध्ये फ्लॅग मार्च केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/