आदित्य ठाकरे ऐवजी शिवसेनेचा ‘हा’ नेता मुख्यमंत्रीपदासाठी योग्य : रामदास आठवले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आदित्य ठाकरेंएवजी तुम्हीच मुख्यमंत्री व्हा असे मी उद्धव ठाकरेंना नक्की सांगेन, असे मत आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होण्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हे मत व्यक्त केले.

ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे आहेत. त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री पदावर दावा केला आहे. याच पार्श्वभूमिवर आठवले यांनी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असे वाटतं का यावर बोलताना आठवले म्हणले, वरळी हा आमचा बालेकिल्ला आहे. सर्व आंबेडकरी मते आदित्य यांना मिळतील. आदित्य ठाकरे यांना मराठी मते मिळतील आणि ते चांगल्या मतांनी विजयी होतील. त्यांनी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहण्यास काही हरकत नाही असे आठवले यांनी म्हटले आहे. मात्र, देवेंद्र फडणवीसच हे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे ते सांगायला विसरले नाहीत.

सध्याच्या परिस्थीमध्ये भाजपला जास्त जागा मिळतील असे सांगताना आठवले यांनी राजकारणामध्ये कधी काहीही होऊ शकतं. शिवसेनेच्या जागा जास्त आल्या तर आदित्य यांचा मुख्यमंत्रीपदासाठी नंबर लागू शकतो. पण अशावेळी आदित्यने मुख्यमंत्री होण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. असे आठवले यांनी मुलाखती मध्ये म्हटले आहे. आदित्य यांना मुख्यमंत्री करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. मात्र, ते मुख्यमंत्री पद सांभाळू शकतील असे वाटत नसल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.

Visit : Policenama.com