‘रायगड’च्या विकासाचं गेल्या 2 वर्षात 1% ही काम झालेले नाही, खा. छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितला गैर’कारभार’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असून या भेटीत छत्रपती संभाजीराजेंनी रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचं काम सुरु आहे याबाबत नाराजी व्यक्त करत त्यावर तोडगा काढण्याबाबत चर्चा केली.

संभाजीराजेंनी स्पष्ट केले की, गडावर कुठलेही बांधकाम करावयाचे असल्यास त्यासाठी नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही. तसेच रायगड प्राधिकरण माझ्या संकल्पनेतून तयार झाले असून त्यासाठी ६०६ कोटी रुपये दिले होते. यामध्ये महाड-रायगड रस्त्याचे १४७ कोटींचे कंत्राट, गावांचे रस्ते, सुशोभिकरण अशा काही कामांचा समावेश होता. परंतु गेली दोन वर्षात एक टक्काही काम झालेले नाही. असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संभाजीराजेंनी आरोप केला की, एमबी पाटील कंत्राटदाराने दुसऱ्या कंत्राटदाराला काम देण्याचे ठरविले आणि शासनाने त्यांना ५% आगाऊ रक्कम देखील दिली. आणि आता ८% नव्या कंत्राटदाराला देण्यात येईल. हे जे काही गैरप्रकार सुरू आहेत याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

संभाजीराजेंनी असे आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले की रायगडाबाबत कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. तसेच कुठल्याही गैरकारभाराकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत अधिकाऱ्यांना योग्य ती समज येईल.

रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, ‘रोप-वे चा जो काही मनमानी कारभार चालू आहे, तो जर असाच चालू राहिला तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल’ असा इशारा त्यांनी दिला.’ तसेच रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा यांचा शिरकाव कधीच होऊ देणार नाही. तसेच पुरातत्व विभागाकडून रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामं रोखली जात आहेत असा आरोप देखील त्यांनी केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/