राहुल गांधींना भाजपानं सुचवलं दुसरं ‘आडनाव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधींनी ‘रेप इन इंडिया’ वक्तव्यावरुन माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. त्यावर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले माझं नाव राहुल सावरकर नाही, गांधी आहे , मी मरेल पण माफी मागणार नाही. रामलीला मैदानावर काँग्रेसच्या ‘भारत बचाव रॅली’दरम्यान ते बोलत होते. यावर भाजपने पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी जिन्ना आडनाव लावावं, असा सल्ला भाजपाचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी दिला आहे.

जी. व्ही. एल. नरसिंह राव यांनी ट्विटरवर म्हंटले आहे की , ‘तुम्हाला गांधी नव्हे, जिन्ना आडनाव जास्त शोभून दिसेल. तुमचं मुस्लीम राजकारण आणि मानसिकता तुम्हाला सावरकर नव्हे, तर जिन्नाचे योग्य वारसदार बनवते. ‘

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. ‘वीर सावरकर तर खरे देशभक्त होते.. उधारीचं आडनाव घेतल्याने कुणीही गांधी होत नाही, कोणी देशभक्त होत नाही… देशभक्त होण्यासाठी धमन्यांमध्ये शिद्ध हिंदुस्तानी रक्त हवं. वेश बदलून अनेकांनी देशाला लुटलं आहे, आता हे होणार नाही. हे तीन जण कोण आहेत? हे देशाचे सर्वसामान्य नागरिक आहेत का?’, असा सवालही गिरीराज सिंह यांनी गांधी कुटुंबाचा फोटो शेअर करत विचारला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी –
काल संसदेत भाजपावाले म्हणाले, भाषणासाठी तुम्ही माफी मागा.मात्र माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. त्यामुळे मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. कोणताही काँग्रेसवाला माफी मागणार नाही. उलट नरेंद्र मोदींना आणि त्यांचे असिस्टंट अमित शाह यांना देशाची माफी मागावी लागेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/