आता सुटया मिठाईवरही कालमर्यादेची सूचना बंधनकारक, अन्यथा लाखाचा होणार दंड

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात आता सुटया मिठाईच्या सेवनाची कालमर्यादा ग्राहकांना सांगणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण’च्या या कायद्याची गुरुवारपासून (1 ऑक्टोबर) देशभर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अन्यथा दुकानदाराला तब्बल एक लाखांचा दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांकडून सुटया मिठाईची मोठया प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र त्यावर मिठाई कधीपर्यंत चांगली राहू शकेल हे यापूर्वी लिहिले जात नव्हते. त्यामुळे खरेदी केलेला पदार्थ किती दिवस चांगला राहू शकतो, हे ग्राहकांना समजत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन हा नवा कायदा लागू करण्यात आला आहे. देशातील अनेक मिठाई दुकानांतून पॅकेजिंग न करता विक्री केली जाते. काही दुकानांमधून छोटया प्लास्टिक बॉक्समधून पदार्थाची विक्री केली जाते. मात्र संबंधित पदार्थ नेमका किती दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो याचा उल्लेख अनेकदा नसतो. नव्या कायद्यानुसार उत्पादकांना अन्नपदार्थावर कालमर्यादेचा उल्लेख बंधनकारक करण्यात आला आहे. कालमर्यादेचा उल्लेख नसलेल्या पदार्थाची मुदत संपली असे गृहीत धरून गुरुवारपासून त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे . मिठाईमध्ये असलेल्या खव्यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. कालमर्यादेचा उल्लेख नसल्यास संबंधित दुकानदाराला लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई होऊ शकते.