भूसंपादन प्रकरणी महापौर, आयुक्तांना खंडपीठाच्या नोटिसा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सावेडीतील तपोवन रस्त्यासाठी भूसंपादन करण्याबाबतचा विषयाबाबत महासभेत निर्णय घेतला नसल्याने महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नोटिसा काढल्या आहेत. त्यावर ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी हॉटेलपासून मनमाड रस्त्यावरील कॉटेज कॉर्नरपर्यंतच्या तपोवन रस्त्यात बन्सीमहाराज मिठाईवाले फर्मचे संचालक नंदलाल जोशी यांची खासगी जागा आहे. या जागेच्या भूसंपादनाबाबतचा विषय मागील १६ जुलैला झालेल्या महासभेसमोर घेण्यात आला होता. मात्र, तो स्थगित ठेवला आहे. त्याबाबत जोशींनी खंडपीठात धाव घेतली आहे. न्यायालयाने वाकळे व भालसिंग यांना नोटिसा काढल्या आहेत. 8 ऑगस्टला यावर पुढील सुनावणी होणार आहे.

याबाबत महापालिका प्रशासनाकडून उच्च न्यायालयामध्ये नेमके काय म्हणणे सादर केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेने निर्णय घेण्यात चालढकल केल्यामुळेच जोशी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.