आता उमेदवारांसाठी ‘जाहिरात’ द्या दानवे यांच्याकडून काँग्रेसची खिल्ली

मुंबई : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आता काँग्रेसला राज्यात एकही उमेदवार मिळणार नाही, त्यांना जाहिरात द्यावी लागेल अशी उपहासात्मक टीका केली आहे.

दानवे म्हणाले की, आता काँग्रेसला राज्यात उमेदवार मिळणे अवघड आहे, त्यांना जाहिरात देऊन उमेदवार मिळवावा लागणार आहे,अशी खिल्ली उडवून काँग्रेसच्या अधोगतीवर भाष्य केले आहे. तसेच औरंगाबाद लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाबाबत बोलताना दानवे यांनी जावई पडल्याचे नाही तर खैरे पडल्याचे दुःख जास्त आहे. मी स्वतः खैरे निवडून येतील असे भाकीत केले होते ;पण काही राजकीय भाकिते चुकतात असेही दानवे यांनी नमूद केले. या निवडणुकीत खैरे उमेदवार नव्हते, तर नरेंद्र मोदी उभे होते. याचबरोबर, पक्ष संघटनेने चांगली कामे केली म्हणून आम्ही जिंकलो असे सांगत पहिल्यांदा सरकार स्थापन करणार, त्यानंतर विधानसभेच्या तयारीला लागणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.