खातेवाटपावर ‘नाराज’ असलेल्या काँग्रेसनं पुन्हा केला ‘या’ पदावर दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप रखडला आहे. काँग्रेसला मनासारखे खाते मिळाले नसल्यामुळे हा विस्तार रखडल्याचे बोलले जात आहे. सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वीच यावर तोडगा निघेल अशी शक्यता असली तरी काँग्रेसला आता उपमुख्यमंत्रीपदाचे वेध लागले आहेत.

महाविकास आघाडीच्या खातेवाटपावर काँग्रेस समाधानी नाही. महत्त्वाच्या खात्यापैकी केवळ महसूल काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. या शिवाय ऊर्जा, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सार्वजनिक बांधकाम, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन अशी खाती काँग्रेसला मिळणार आहेत. काँग्रेसला मिळालेल्या खात्यांच्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला चांगली खाती येणार आहेत.

दरम्यान, विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेच्यावेळी काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद दिल्याने काँग्रेसने उपमुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडला होता. त्यामुळे हे पद राष्ट्रवादीला मिळणार हे जवळपास निश्चत झाले होते. मात्र, नवीन रचनेत गृहखातं राष्ट्रवादीने घेतलं आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाचं काय यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पुन्हा उपमुख्यमंत्री पदावर दावा केला जात आहे.

काँग्रेसला मिळालेल्या मंत्रीपदांमध्ये बदल करुन हवा आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेली खाते काँग्रेसला हवे आहेत. त्यासाठी नेत्यांचा पाठपुरावा सुरु असून ग्रामविकास, सहकार आणि कृषी यापैकी एक काँग्रेसला हवं आहे. त्यावर आता महाविकास आघाडी काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/