ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय ! आता थेट 3 लाखांचं बिनव्याजी पीककर्ज मिळणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत आता 3 लाखांपर्यंत बीनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीनं लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्यातील सरकारनं घेतला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला तरच शेती संदर्भात नियोजन करणं सोयीचं होणार आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेता वेळेवर कर्ज उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी लागणार असल्याच्या सूचना सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.

3 लाखांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी देण्यात येणार
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. यात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज 2 टक्के व्याजानं दिलं जातं. परंतु यंदा खरीप हंगामासाठी 3 लाखांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिलं जाणार आहे असं ठाकरे सरकारनं सांगितलं आहे.

शेतकऱ्यांना कर्जवाटपाची प्रक्रिया किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी लागणार
कर्जमाफी योजनेचा फायदा न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं लाभ देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना सहकार विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तालुका जिल्हा समितीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही यावेळी सहकारमंत्र्यांनी दिल्या आहेत. प्रत्येक वर्षी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्जवाटपाची प्रक्रिया 31 मार्चपर्यंत पूर्ण करावी. प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी जिल्ह्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला केसीसी रुपे डेबिट कार्ड वितरीत करून त्यांना पेटीएमद्वारे रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.