एसटी बसचे आरक्षण ६० दिवस आधीच करता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गणेशउत्सवासाठी एसटी बसने गावी जाणाऱ्या लोकांना आता प्रवाशांच्या गर्दीपासून सुटका मिळणार आहे. कारण आता जातानाचे आणि परतीच्या प्रवासाचे आरक्षण एकाच वेळी करता येणार आहे. एसटीने त्यासाठी प्रायोगिक तत्वावर ६० दिवस आधीच आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील लाखो एसटीच्या प्रवाशांना होणार आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी ही माहिती दिली आहे.

एसटी महामंडळाने यंदा मुंबई उपनगरातून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमित बसेस व्यतिरिक्त २२०० जादा बसेसची सोय केली आहे. या गाड्यांचे आरक्षण २७ जुलै (२६ जुलैच्या मध्यरात्रीपासून) सुरू होणार आहे. यंदा पहिल्यांदाच प्रवाशांना जाताना-येतानाचे एकत्रित आरक्षण उपलब्ध करून करून देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने ६० दिवस अगोदर आरक्षण करण्याची सुविधा प्राप्त करून दिली आहे. यापूर्वी ती ३० दिवस होती. साहजिकच कोकणात जाणाऱ्या नोकरदारांना परतीच्या आरक्षणासाठी तिथल्या बसस्थानकावर ताटकळत उभे राहण्याची आता आवश्यकता राहणार नाही.

या सुविधेच्या अनुषंगाने तांत्रिक बदल करण्यासाठी आरक्षण प्रक्रिया २६ जुलै रोजी संध्याकाळी ४ ते मध्यरात्री १२:३० पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे आरक्षण तिकीट काढणे अथवा रद्द करणे ही प्रक्रिया करता येणार नाही. २६ तारखेच्या मध्यरात्रीपासून सुधारित आरक्षण प्रणाली आरक्षणासाठी उपलब्ध असणार आहे. याची प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –