आता देशात धावणार ‘टाटा’ आणि ‘Hyundai’ च्या रेल्वे, जाणून घ्या कोठे किती ‘तिकीट’ असेल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात खाजगी ट्रेन चालवण्याचा रस्ता २०२० च्या अर्थसंकल्पात मोकळा झाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले होते की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत १५० गाड्या चालवल्या जातील. यासाठी रेल्वेने देशभरातून १०० मार्ग निवडले आहेत, ज्यामध्ये मुंबई – दिल्ली तसेच हावडा – दिल्ली सारखे व्यस्त मार्ग समाविष्ट आहेत. आता ह्युंदाई आणि टाटा सारख्या अनेक देशी-परदेशी खासगी कंपन्यांनी ट्रेनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी रस दर्शविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी ट्रेनसाठी अधिकाधिक कंपन्यांनी रस दाखविला आहे. यामध्ये अल्स्टॉम ट्रान्सपोर्ट, बॉम्बार्डियर, सीमेंस एजी, ह्युंदाई रोटेम कंपनी आणि मॅकक्वेरी यासह अनेक जागतिक दर्जाच्या कंपन्यांनी रस दाखविला असून देशांतर्गत कंपन्यांमध्ये टाटा रियल्टी अ‍ॅड इंफ्रास्ट्रक्चर, हिताची इंडिया आणि साउथ एशिया, एस्सेल ग्रुप, अदानी पोर्ट्स आणि सेझ (एसईझेड), भारतीय रेल्वे केटरिंग अ‍ॅड टुरिझम कॉर्पोरेशन यांचा समावेश आहे. एका अहवालानुसार देशातील १०० भारतीय रेल्वे मार्गावर १५० खासगी गाड्या चालविण्यासाठी सुमारे २२,५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची आवश्यकता आहे.

खाजगी ट्रेन किती वेळात निश्चित ठिकाणावर पोहोचेल ?
योजनेनुसार खासगी ट्रेन आपल्या निश्चित केलेल्या स्थानावर तेवढ्याच वेळात पोहोचेल जेवढा वेळ सर्वात वेगवान धावणारी सरकारी ट्रेन घेते. तथापि, खासगी कंपन्यांना थोडा दिलासा देण्यासाठी रेल्वे त्या मार्गावर खासगी ट्रेन सुटण्यासाठी निर्धारित वेळेच्या १५ मिनिटांमध्ये इतर कोणतीही नियमित धावणारी रेल्वे सुटणार नाही, याची काळजी घेणार आहे.

कोण ठरवणार भाडे
खासगी कंपन्या भाडे व थांबे निश्चित करण्यासाठी तथा भारतीय रेल्वेच्या मानकांनुसार कोणत्याही कंपनीकडून कोच व इंजिन खरेदी करण्यास स्वतंत्र असणार आहेत. तसेच कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर ५ वर्षात कंपन्यांना सर्व गाड्या चालवाव्या लागणार आहेत.