आता रिक्षा, टॅक्सी चालवण्यासाठी कमर्शियल लायसन्सची गरज नाही

नवी दिल्ली: वृत्तसंस्था
आता रिक्षा, टॅक्सी चालवण्यासाठी व्यावसायिक परवान्याची गरज नसेल. केंद्रीय परिवहन मंत्रालयाने रिक्षा, टॅक्सी आणि ई रिक्षाचालकांना मोठा दिलासा दिलासा देणारा हा नवा निर्णय जाहीर केला आहे. यामुळे तुमच्याकडे जर केवळ हलक्या वाहनांचा परवाना म्हणजेच लाईट मोटर व्हेईकल लायसन्स असल्यास देखील तुम्हाला रिक्षा, टॅक्सी आणि ई-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळणार आहे. मात्र ट्रक, बस तसेच इतर अवजड वाहने चालवण्यासाठी निर्धारित केलेल्या नियमानुसारच परवाने घ्यावे लागणार आहेत.

परिवहन मंत्रालयाने दिल्लीसह सर्व राज्यांसाठी नवी नियमावली लागू केली असून, या नवीन नियमानुसार ज्या वाहनांचे वजन 7,500 किलोपेक्षा कमी असेल अशी वाहने चालवण्यासाठी व्यावसायिक परवाण्याची गरज नसणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2007 मध्ये दिलेल्या अध्यादेशाच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. गाडीचा विमा वाहनाच्या श्रेणीनुसार असतो, त्याचा परवान्याशी संबंध नसतो, असं सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे.
तसेच सरकारने घेतलेल्या या नवीन निर्णयामुळे व्यावसायिक वाहन चालक परवाना प्रक्रियेत होणाऱ्या भ्रष्टाचारास आळा बसेल असे परिवहन मंत्रालयामधील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.