झोळी करून आजोबांना नेले दवाखान्यात, रत्नागिरीतला व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा करणार्‍या अधिकार्‍यांच्या डोळ्यात अंजन घालणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात घडली. रुग्णवाहिका नसल्यामुळे 90 वर्षांच्या आजोबांना लाकडाला झोळी करून नेण्याची नामुष्की कुटूंबियावर ओढावली आहे.

कावळे गावातील जानकरवाडी इथे ही घटना घडली असून गावातील 90 वर्षीय गोविंद पांडुरंग जानकर यांनी तब्बेत अचानक खालावल्याने त्यांना एका लाकडाला बांधून पाच ते सहा किलोमीटर ग्रामस्थांनी उचलून जंगलातील पायवाटेने मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागले. वेळेत दवाखान्यात नेल्यामुळे त्यांचा जीव वाचवण्यात आला. 35 ते 40 लोकसंख्या असणार्‍या या वाडीमध्ये रस्ताच नाही. येण्या-जाण्यासाठी या गावातील लोकांना घनदाट जंगलातून पाय वाटेने जावे लागत आहे. वाडीत कुणी आजारी पडले किंवा एखादी दुर्घटना घडली की, लाकडाला झोळी करून किंवा डोली तयार करून न्यावे लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी चिपळूण तालुक्यात देखील अशाच प्रकारे धनगर वाडीतील एका गर्भवती महिलेला डोलीतून दवाखान्यात घेऊन जावे लागले होते. त्यावेळी जंगलातच तिची प्रसूती झाल्याची घटना घडली होती. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम आणि जंगलमय भागातील या लोकांचा वनवास थांबणार तरी कधी असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे.