‘त्या’ दोघांच्या मृत्यूप्रकरणी औरंगाबादेत मनपा आयुक्ताला मारहाण 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभरात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यालगत असलेले उघडे नाले मृत्यूचा सापळा बनत आहेत. आता औरंगाबाद येथे सलग दोन दिवसात दोन व्यक्तींचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी मनपा आयुक्तांना मारहाण केली आहे.

याबबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, औरंगाबाद शहरातील जय भवानी नगर येथील नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. ही घटना ताजी असतानाच, आज पुन्हा एकदा एन सिक्स परिसरात एकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. चेतन चोपडे असे मृत व्यक्तीचे नाव असून ते 38 वर्षांचे होते. चेतन बुलेट गाडीसह नाल्यात पडल्याने ही दुर्घटना घडली.

मृत चेतन चोपडे रात्री घरी जात होते. शहरात अचानक पावसाचा जोर वाढल्यामुळे त्यांना रस्ता आणि नाला यातील फरक कळला नाही आणि ते थेट नाल्यात जाऊन पडले. काही वर्षांपूर्वी याच नाल्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तरी देखील महानगरपालिकेला जाग आली नाही. त्यामुळे महापालिका असे आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.

दोन दिवसापूर्वी नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाला असतानाही, पालिकेने शहरातील उघड्या नाल्यांवर जाळी टाकण्याचे  काम केले  नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.