निर्यातबंदीनंतरही कांदा दरातील ‘तेजी’ कायम !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात कांद्याची निर्यातबंदी केल्याने दर कमी होतील, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, किरकोळ बाजारात कांदा दरात तेजी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रासह दक्षिणेकडील राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या कांद्याला मागणी वाढली असल्याने कांद्याचा दर किलोमागे 30 ते 40 रुपये आहे.

कांद्यांची महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात मोठेया प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, महिन्याभरापासून महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे शेतात लागवड करण्यात आलेल्या कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. नवीन कांद्याचा हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होतो. त्यामुळे महाराष्ट्रातील नवीन कांद्याचा हंगाम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील नवीन लाल कांद्याचा हंगाम सप्टेंबर महिन्यात सुरू होतो.

मात्र, तेथे झालेल्या पावसामुळे नवीन कांद्याचे मोठे नुकसान झाले असून कांद्याच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. कांद्याला दक्षिणेकडील राज्यासह देशभरातून मागणी आहे. चाळीत साठवलेला जुना कांदा सध्या बाजारात विक्रीस पाठविला जात आहे. मार्केटयार्डातील घाऊक बाजारात दररोज 40 ते 50 ट्रक कांद्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या दहा किलो जुन्या कांद्याला 360 ते 400 रुपये असे दर मिळाले आहेत. मध्यम प्रतीच्या दहा किलो कांद्याला 300 ते 350 रुपये असे दर मिळाले आहेत.