सर्वसामान्यांना रडवणारा ‘कांदा’ आता शेतकऱ्यांना ‘रडवतोय’, 2 दिवसात कांद्याच्या भावात मोठी घसरण

व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून निर्यातबंदी हटविण्याची मागणी

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यांपासून सर्वसामान्यांना रडवणारा कांदा आता शेतकऱ्यांना रडवत आहे. दोन दिवसांत कांद्याच्या दरामध्ये तब्बल आठशे रुपयाची घसरण झाली आहे. ऐतिहासिक भावाची मजल मारणारा कांदा आता मातीमोल भावाने विक्री होत असल्याने शेतकरी पूर्णता हतबल झाला आहे. शेतकऱ्यांना रडवणाऱ्या कांद्याचे दर गडगडले असून कांदा प्रति क्विंटल दोन हजार रुपयांच्या आत आल्याने शेतकऱ्यांचे संपूर्ण बजेट कोलमडले आहे. लांबलेला पाऊस आणि अवकाळीमुळे कांद्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने कांद्याने दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलोचा टप्पा पार केल्याने केंद्र सरकारने तुर्कस्तानातून कांदा आयात केला होता. हॉटेल व्यवसायिकांकडून या कांद्याला मागणी होती, मात्र आता बाजारात कांद्याची आवक वाढू लागल्याने दर झपाट्याने कोसळले आहे.

यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपेक्षित आहे. यंदा देशात गेल्यावर्षीपेक्षा १६ लाख टनाने कांद्याचे उत्पादन वाढणार असल्याचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. कांदा उत्पादन वाढीमध्ये नाशिक आणि नगर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. दररोज कांद्याच्या दरामध्ये घसरण होत असल्याने घसरण थांबविण्यासाठी कांदा निर्यातबंदी उठवण्याकडे नजरा लागल्या आहेत.

दहा ते बारा आठवड्यापूर्वी गगणाला भिडलेले कांद्याचे भाव अचानक १८ रुपयांवर येऊन ठेपले आहेत. परदेशातून आयात केलेला कांदा तसेच महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटकमध्ये रांगड्या कांद्याचे घेतलेले उत्पन्न यामुळे बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. याचा परिणाम कांद्याचे दर कोसळण्यात झाला आहे. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा मोठा अतिरिक्त साठा निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वेळीच निर्यातबंदी मागे न घेतल्यास येणाऱ्या काही आठवड्यात महाराष्ट्रासह देशातील कांदा उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज येथील बाजार समितित लाल कांदयाला कमीत कमी ९०० सरासरी १८०० जास्तीत जास्त २१५२ रुपये भाव मिळाला.

देशांतर्गत बाजारपेठेत मागणीच्या तुलनेमध्ये कांद्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याने भावात घसरण दिसत आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित हटवावी जेणेकरून कांदा बाजारभावातील घसरण थांबण्यास मदत होईल. अशी प्रतिक्रिया व्यापारी प्रतिनिधी यांनी दिली.

कांदा लागवडीच्या खर्चामध्ये दुपटीने वाढ झालेली आहे त्या तुलनेत मिळणाऱ्या बाजारभावातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधी या गोष्टीकडे गांभीर्याने घेत नसल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी निवृत्ती न्याहारकर यांनी दिली.