मला भाजपधून फक्त ‘त्या’ एका नेत्याचा कॉल आला, एकनाथ खडसेंनी सांगितलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन –  मागील अनेक दिवसांपासून भाजपमध्ये ( BJP) नाराज असणाऱ्या एकनाथ खडसेंनी ( Eknath Khadse) अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर आता खडसे हे शुक्रवारी 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( NCP) प्रवेश करणार आहेत. त्यानंतर मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांच्यावर देखील आरोप केले. त्याचबरोबर माझा नेमका गुन्हा काय, पक्षातल्या इतर मंत्र्यांवरही आरोप झाले असताना केवळ माझाच राजीनामा का घेतला, मला वेगळी वागणूक का दिली गेली, असे अनेक प्रश्न उपस्थित केले.यावेळी मुलाखतीमध्ये मी अमित शाह, पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. त्याचबरोबर भाजपमध्ये ( BJP) होत असलेल्या अन्यायाची व्यथा मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. मात्र कोणीही मला गांभीर्यानं घेतलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

‘दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P.Nadda) यांची भेट घेतली. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांना भेटलो. गृहमंत्री अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi) यांना भेटून गाऱ्हाणं मांडलं. तुम्ही देवेंद्र यांना घेऊन या. आपण चर्चेतून मार्ग काढू असं सांगण्यात आलं. हा निरोप मी देवेंद्रजींना दिला. त्यावर पुढील आठवड्यात जाऊ. पुढील महिन्यात जाऊ, असं म्हणत त्यांनी ४ वर्षे घालवली, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला. त्याचबरोबर खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. खडसेंनी पक्ष सोडायला नको होता, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यावरही खडसेंनी भाष्य केलं. ‘माझ्याविरोधात करण्यात आलेल्या कट कारस्थानांचे पुरावे पक्षाला दिले. मात्र तरीही कारवाई झाली नाही. त्यामुळे पक्षाला आता माझी गरज राहिलेली नाही, हे माझ्या लक्षात आलं. एकाही नेत्याने भाजपा सोडणार कळाल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. पण त्यानंतर काहीच चर्चा झाली नसल्याचे देखील त्यांनी म्हटले.

दरम्यान,माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर आरोप झाले. मात्र केवळ मलाच राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. इतरांना मात्र क्लीन चीट देण्यात आल्या. इतरांना आणि मला वेगळा न्याय का, असा सवाल खडसेंनी विचारला. त्याचबरोबर गुन्हे दाखल असणाऱ्यांना आणि इतर पक्षातील नेत्यांना पाठीशी घालण्यात आले, पण ४० वर्ष पक्षासाठी कष्ट केलेल्या नेत्यावर अशी वेळ दुर्दैवी असल्याचे देखील त्यांनी यावेळी म्हटले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच राज्यातील सत्ता गमावल्याची टीका त्यांनी यावेळी केली. २०१४ मध्ये आमच्याकडे पैसा, साधनं नव्हती. तरीही आम्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोबत नसतानाही १२३ जागा जिंकलो. देवेंद्रजी मी पुन्हा येईन म्हणत होते. लोकांना हा अहंकार आवडला नाही. त्याऐवजी आम्ही पुन्हा येऊ म्हणायला हवं होतं, असा टोला देखील खडसे यांनी लगावला.