‘पुलवामा’सारखी घटना घडली नाही तर महाराष्ट्रात सत्ताबदल नक्की पवारांनी व्यक्त केला ‘विश्वास’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजप सरकार विरोधात सर्वसामान्यांमध्ये खूप नाराजी होती मात्र पुलवामानाची घटना घडली आणि सर्व चित्रच बदलले. राज्यात सुद्धा सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे मात्र अशा परिस्थितीत पुलवामासारखी घटनाच निवडणुकी आधी चित्र बदलू शकते असं खळबळजनक वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकच्या सभेत पवारांवर आरोप केले होते. यावर बोलताना पवार म्हणाले की पाकिस्तानमधील सत्ताधारी आपली सत्ता टिकावी यासाठी भारतविरोधी बोलत असतात आणि स्वतः साठी फायद्याचे वातावरण तयार करतात असे मी म्हणालो होतो आणि मोदी म्हणतात मी पाकिस्तानची स्तुती केली, ही काय पाकिस्तानची स्तुती आहे का ? असा प्रतिसवाल पवार यांनी यावेळी केला आहे.

फडणवीस काय आणि नाना फडणवीस काय असे म्हणत मुख्यमंत्री नाशिकमध्ये काय बोलले त्याने काही फरक पडत नाही मात्र पंतप्रधानांनी तसे बोलायला नको होते असेही शरद पवार यावेळी म्हणाले. पुलवामा हल्ल्याबद्दल आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना सुद्धा शंका होती मात्र बाब देशाशी निगडित असल्यामुळे मी यावर कोणाला बोलू नका असे सांगितले तसेच पंतप्रधान पदाचा मला आदर आहे आणि या पदाची मला अपप्रतिष्ठा करायची नाही कारण हे पद लोकशाहीसाठी महत्वाचे आहे. म्हणून मी हे मुद्दाम सांगतो असे स्पष्टीकरण शरद पवारांनी यावेळी दिले.