विधानसभा 2019 : भाजपने एकाही मुस्लीम व्यक्तीला दिली नाही उमेदवारी !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये हिंदु नंतर मुस्लीम समाजाची लोकसंख्या जास्त आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख चार राजकीय पक्षांनी केवळ 60 मुस्लीम उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. सबका साथ सबका विकास असे सांगत सर्वाधिक जागा लढविणाऱ्या सत्ताधारी भाजपने मुस्लीम समाजातील एकालाही उमेदवारी दिलेली नाही. तर त्यांचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने केवळ दोघांना तिकीट दिले आहे.

राज्यात 12 टक्के (1 कोटी 30 लाखापेक्षा अधिक) मुसलमान समाज आहे. राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ तीन टक्के मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रामध्ये 288 जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 3 हजार 239 उमेदवार निवडणूक लढवत असून यामध्ये केवळ 100 पेक्षा अधीक मुस्लीम उमेदवार आहेत.

राज्यातील 288 मतदारसंघातून एकूण 3 हजार 239 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 164 जागा लढविणाऱ्या भाजपने एकही मुस्लीम उमेदवाराला संधी दिली नाही. ज्या ठिकाणी मुस्लीम उमेदवार उभे आहेत त्यापैकी बहुतांश उमेदवार हे एकाच मतदारसंघातून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. विजयापेक्षा प्रमुख प्रतिस्पर्ध्याची मते खाण्यासाठी ते उपद्रव्य मूल्य ठरणार आहे.

भाजप राज्यामध्ये 164 जागांवर लढत असून त्यांनी 2014 प्रमाणेच यंदाही एकाही मुस्लीम समजातील उमेदवाराला तिकीट दिले नाही. तर मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने अब्दुल सत्तार आणि मराठी चित्रपट अभेनेत्री दीपाली उर्फ सोफिया सैय्यद यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने 11 मुस्लीम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ज्यामध्ये तीन विद्यमान आमदार आहेत. तर काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका विद्यामान आमदारासह चार मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिले आहे.

Visit : Policenama.com