सोशल मीडियावर बंदी आणण्याचा सरकारचा ‘डाव’ ? शरद पवारांनी ‘दंड’ थोपटले

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व कायद्यानंतर सोशल मीडिया बंदी घालणारा कायदा करण्याचा प्रयत्न होत असून हा कायदा देशातील सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा आहे. त्यामुळे त्याला रोखण्यासाठी भाजपविरोधी शक्तींना एकत्रित करून संघर्ष उभारेल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूर येथे केली. पवारांनी या माध्यमातून तरूणांना नव्या लढ्याची हाक दिल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार हे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नागपूर येथे विधीमंडळ अधिवेशनादरम्यान आले आहेत. येथील देवगिरी या शासकीय निवास्थानी त्यांनी पत्रकारांशी अनौपचरिक संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला देशभरातील तरुणांनी केलेला जोरदार विरोधच भविष्यात सत्तांतर घडवून आणणार आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्यावर बोलताना पवार म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायदा करताना देशभरातून विरोध होणार नाही, अशी अपेक्षा मोदी सरकारला होती. मात्र केंद्र सरकारच्या या दाव्याला देशभरातील तरुणांनी छेद दिला आहे. जो निषेधाचा सूर या कायद्याविरोधात उभा राहिला आहे तो निश्चितच पुढील सत्तांतर करण्यास कारणीभूत ठरेल.

सन १९७७ मध्ये सुद्धा तरुणांनी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन काँग्रेस सरकार विरोधात बंड पुकारले होते. तरुणांनी उभारलेल्या त्या बंडाचा शेवट सत्तांतरामध्ये झाला होता. केंद्र सरकार आता सोशल मीडिया बंदी कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहे. हा कायदा भारतीय जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असेल.

काही कारणास्तव सोशल मीडिया नकारात्मक वाटत असला तरी त्यावर बंदी आणणे हा अंतिम उपाय नाही. या कायद्याला रोखण्यासाठी देशभरातून भाजपविरोधी सर्व पक्षांची मोट बांधून त्याविरोधात ठोस लढा उभारावा लागेल. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने या संघर्षात उतरेल, असा इशारा पवार यांनी दिला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/