सरकार पडणार म्हणण्याशिवाय विरोधकांकडे टीकेसाठी दुसरे मुद्देच नाहीत : खा. सुप्रिया सुळे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   विरोधकांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले आहेत. परिणामी त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असं म्हणावं लागतं आहे. सरकार पडणार! या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नाही अशी खरमरीत टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामतीतील म.ए.सो. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

कोविड, अतिवृष्टी या सारख्या अडचणी व संकटावर सरकारने यशस्वी मात केली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केलेले आहे. महाविकास आघाडीची अनेक आश्वासने कागदावरच असल्याचा आरोप होतो या प्रश्नाचं उत्तर देताना सुळे म्हणाल्या, ”विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही, महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर उत्तम काम करत आहे. परदेशातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा जी माहिती त्यांना दिली जाते, त्यातही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याचेच नमूद केलेले आहे.”

दरम्यान, खासदार सुळे पुढे म्हणाल्या, वातावरण चांगले आहे, हवाही स्वच्छ आहे, लॉकडाऊनमुळे प्रदूषण खूप कमी झालं आहे, महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यात वातावरण चांगले आहे. शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न संवेदनशीलपणे मांडण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.

आचारसंहिता असल्याने काही बाबींवर मोकळेपणाने बोलता येत नव्हतं . आता आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचे धोरण आपल्याला लवकरच समजेल. वीजबिलांच्या तक्रारीबाबत ठोस निर्णय शासन घेत नाही, याबाबत सुळे यांनी भाष्य केलं.