काँग्रेसच्या रक्तातच आणीबाणी भिनलेली, दरेकर यांची टीका

रायगड : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसच्या रक्तामध्येच आणीबाणी भिनलेली (emergency-blood-congress) आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सरकारने अटक करून आणीबाणीसारखीच परिस्थिती निर्माण केली आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen-darekar) यांनी अलिबाग येथे केली.
गोस्वामी यांना अटक केल्याने भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांनी अलिबागकडे धाव घेतली. बुधवारी दुपारी अडीच वाजता अलिबाग येथील भाजपच्या जिल्हा कार्यालयातून मोर्चा काढला. भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. अन्वय नाईक यांच्या प्रकरणाआडून सरकार गोस्वामी यांच्यावर कारवाई करत आहे, याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असे दरेकर यांनी स्पष्ट केले.

सरकार आपले अपयश लपवण्यासाठी अशी सुडात्मक कारवाई करत आहे. महत्त्वाच्या घटनांकडून लक्ष दुर्लक्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. गोस्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने काढलेल्या मोर्चाला पोलिसांनी अरुणकुमार वैद्य हायस्कूल येथे अडवले. या प्रसंगी भाजप नेते किरीट सोमय्या, प्रवक्ते आमदार राहुल नार्वेकर, आमदार रवींंद्र पाटील, जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते युवा अध्यक्ष विक्रांत पाटील सहभागी होते.